Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ब्राह्मण समाज कधीच काही मागत नाही : फडणवीस

ब्राह्मण समाज कधीच काही मागत नाही : फडणवीस 



मुंबई : खरा पंचनामा 

ब्राह्मण समाज कधीच काही मागत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. डोंबिवली येथील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाची स्तुती केली आहे. डोंबिवलीतील जागतिक बिजनेस परिषदेला फडणवीस उपस्थित होते. ब्राह्मण समाजाच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो. मात्र या समाजाने कधीच काही मागितलं नाही. स्वयंभू असलेला ब्राह्मण समाज उत्तरोत्तर प्रगती करत आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाचे कौतुक केले आहे. 

मागणं काही वाईट नसतं. राज्यकर्त्यांकडे आपल्या मागण्या मागितल्या पाहिजे. मात्र, आम्ही तुमच्याकडे काही मागणार नाही. आम्ही आमच्या बळावर करू हा आत्मविश्वास त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे असे उद्गार काढीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाची स्तुती केली. यापूर्वी 'द इनसायडर'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी जात फॅक्टरवर रोखठोक मत मांडले होते. 

राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात असं देवेंद्र फडणवीस या मुलाखतीत म्हणाले होते. जातीचा अभिमान वाटण्याचे दिवस नाहीत. तुमचं कर्तृत्त्व चांगलं असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याकडे जातिव्यवस्थेचा जरा अतिरेकच दिसतो. कुणी खालचा, कुणी वरचा, हा हिंदू धर्मच नाही. या उच्च-नीचतेचा तिरस्कारच केला पाहिजे. कर्तृत्त्वाचा अभिमान बाळगला पाहिजे अशी ठाम भूमिका फडणवीस यांनी मुलाखतीत मांडली होती. 

आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे असे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. ब्राह्मण बुद्धिजीवी आहेत, ब्राह्मण लोकांना मार्केटिंग जमत नाही, पण जे काम करतो त्यातून आमच्या कामाची प्रचिती येते. नाशिकमध्ये ब्राह्मण समाजाच्या एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाबद्दल गौरवोद्गार काढले होते.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.