नवाब मलिक पुरते अडचणीत!
काल फडणवीसांचा लेटरबॉम्ब अन् आज तपास यंत्रणा कोर्टात जाण्याच्या तयारीत
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर हजेरी लावल्यानंतर विधानसभेत आणि राज्यामध्ये सुद्धा अक्षरशः रणकंदनसुरू आहे. हिवाळी अधिवेशनाचा दिवस नवाब मलिक यांच्याभोवती फिरत राहिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून नवाब मलिक यांना महायुतीमध्ये सामील करून घेऊ नये असं सांगत पत्र लिहिलं. या पत्रानंतर पुन्हा एकदा एकच राजकीय धुरळा उडाला.
आता नवाब मलिक यांना महायुतीत सामील करून घेण्यावरून अजित पवार गट आणि भाजप शिंदे गट यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच तपास यंत्रणा सुद्धा आता नवाब मलिकांविरोधात पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडे आड तिकडं विहीर अशा मनस्थितीत अडकण्याची चिन्हे आहेत. नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपास यंत्रणा कोर्टात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाने त्यांना केवळ आणि केवळ नाजूक प्रकृती असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यांच्याकडून जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून होत आहे. त्यामुळे एकंदरीत पुन्हा एकदा तपास यंत्रणा न्यायालयामध्ये जाऊन मलिक यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन करत असल्याचा तपास यंत्रणाचा आरोप आहे. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला होता. तो दोन महिन्यांसाठी आणखी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांची ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल एक वर्ष पाच महिन्यांनी जेलमधून सुटका झाली होती. सातत्याने त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करत न्यायालयात दाद मागितली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.