त्यांना पोहता येत होतं, मग बुडाले कसे?
वर्षभर बायकोच्या डोक्यात शंका; अखेर पुण्यातील हत्येचं गूढ उकललं
पुणे : खरा पंचनामा
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातल्या त्यात पुण्यात याचं प्रमाण हद्दीच्या बाहेर गेलंय. हत्या, बलात्कार अन्य गुन्हेगारींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
हडपसरमधील अशाच एका हत्येचं खरं कारण आता समोर आलं आहे. परिसरातील उन्नतीनगर येथे एका व्यक्तीचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्षभरापूर्वी म्हणजे २०२४ मध्ये समोर आली होती. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू समजला गेला. मात्र, मृत व्यक्तीला पोहता येत असल्यानं त्याच्या पत्नीनं संशय व्यक्त केला होता. बायकोने घेतलेल्या संशयावरुन तब्बल एक वर्षानंतरच्या चौकशीनंतर व्यक्तीचा अपघात नसून हत्या असल्याचं आता उघड झालं आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी केलेल्या तपासातून शक्य झाली असून, पार्टीत झालेल्या वादातून दोघा मित्रांनी सदर व्यक्तीस कालव्यात ढकलून दिल्याचं निष्पन्न झालं आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असं आहे. तर या प्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, रा. साक्षी लॉन्स, कमळापूर रोड, छत्रपती संभाजीनगर) आणि त्याचा साथीदार आशिष यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हत्येची घटना ४ मे २०२४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. विनोद शार्दुल हे पोहायला सक्षम होते, त्यामुळे ते सहज बुडून मरणं शक्य नव्हतं. मात्र, तपासात समोर आलं की, पार्टी सुरु असताना वाद झाला आणि वैभव आणि आशिष या दोघांनी मिळून विनोद यांना मारहाण केल्यानंतर थेट वाहत्या पाण्यात ढकलून दिलं. कालवा भूमिगत असल्यानं त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि पाण्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह वाहत जाऊन उन्नतीनगर येथे आढळून आला. अशाप्रकारे या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.