जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार
मृत, हल्लेखोर शिरोळ तालुक्यातील आगर येथील
इचलकरंजी : खरा पंचनामा
शहापूर येथील लोटस पार्क कमानी समोरील मोकळ्या मैदानात एका मित्राचा गावाकडील जुन्या वादातून मित्रानेच कोयत्याने वार करून खून केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. मृत आणि हल्लेखोर दोघेही शिरोळ तालुक्यातील आगर येथील आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
गणेश रमेश पाटील (२१) असे मृताचे नाव आहे. याबाबत अभिषेक सुकुमार मस्के याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून मौजे आगर येथे एकाच परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी या दोघांमध्ये गावाकडील काही कारणावरून वाद झाला होता. तो वाद त्यावेळी मिटविला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क कमानी समोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी अभिषेक यांने सोबत आणलेल्या कोयत्याने गणेश याच्या डोक्यात, मानेवर, तोंडावर सपासप वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. हे पाहून अभिषेक तेथून पळून गेला.
या घटनेनंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला उपचारासाठी इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले. काही वेळातच गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती समजताच आराग परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद नामदेव गणपती चव्हाण यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.