Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्हे शाखेत खोगीर भरती नको : काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाका पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे निर्देश

गुन्हे शाखेत खोगीर भरती नको : काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाका 
पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे निर्देश

अहिल्यानगर : खरा पंचनामा 

अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना आणि पोलिस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या तपासाच्या संख्येने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मंगळवारी पोलिस अधिकाऱ्यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन कठोर निर्देश जारी केले. गुन्हे शोध पथकातील निष्क्रिय कर्मचाऱ्यांना काढून त्यांच्या जागी कार्यक्षम आणि माहितीगार कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय, रात्रीच्या गस्तीवेळी लोकेशन आणि फोटो अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, दर दहा दिवसांनी गुन्ह्यांच्या तपासाचा आढावा घेतला जाणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात चोरी, घरफोडी आणि खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकसोमनाथ घार्गे यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली. त्यांनी स्पष्ट केले की, गुन्हा घडल्यानंतर एका महिन्याच्या आत तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. यासाठी पोलिस यंत्रणेला तपास प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुन्हे शोध पथकातील सुधारणा

जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथक (डिटेक्शन बँच) कार्यरत आहे. मात्र, या पथकातील काही कर्मचारी तपासाच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कठोर भूमिका घेत, सोमनाथ घार्गे यांनी अशा निष्क्रिय कर्मचाऱ्यांना तातडीने काढून टाकण्याचे निर्देश दिले. त्यांच्या जागी चांगले माहितीगार, कार्यक्षम आणि तपासात प्रावीण्य असलेल्या कर्मचाऱ्यांना संधी देण्याचे आदेश देण्यात आले. गुन्हे शोध पथक हे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, फक्त मेहनती आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांनाच या पथकात स्थान मिळणार, असेल याची काळजी घ्यावी, असे घार्गे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीचे महत्त्व ओळखून पोलिस अधीक्षकांनी यावर विशेष लक्ष केंद्रित केले. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपले लोकेशन आणि फोटो अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होईल आणि त्यांच्या कार्यक्षमतेची खातरजमा करता येईल. याशिवाय, या लोकेशन आणि फोटोंची दररोज तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

गुन्ह्यांच्या तपासात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी दर दहा दवसांनी आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास, प्रलंबित असलेल्या प्रकरणांची स्थिती आणि अवैध धंद्यांवरील कारवाई यांचा सविस्तर अहवाल तपासला जाईल. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना या आढाव्यासाठी तयार राहण्याचे आणि आवश्यक माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर एखाद्या पोलिस ठाण्यात गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहिल्यास, संबंधित अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरण्यात येईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.