शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला?
आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
नागपूर : खरा पंचनामा
वंदे मातरम हे केवळ गीत नाही तर हे भारताच्या स्वातंत्र्याचा मंत्र आहे, हा राष्ट्रवादाचा मंत्र आहे. ज्या वंदे मातरमला गाताना भारताच्या कित्येक स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारी फाशीवर गेले परंतु उप तक नाही म्हटलं, हा तो महामंत्र आहे.
या महामंत्राने सामान्य व्यक्तीला स्वतंत्रतेच्या आंदोलनाशी जोडलं, आता त्याचे दीडशे वर्ष पूर्ण झाल्यावर संसदेत चर्चा होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत वंदे मातरमच्या संसदेतील चर्चेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. तसेच, आदित्य ठाकरे यांनी वंदे मातरम घोषणेला बंदी केल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर उत्तरही दिलंय. वंदे मातरमवर कधीच बॅन लागलेला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आज आमच्या विधानसभेतही आम्ही लोकांनी संपूर्ण वंदे मातरम गाऊन या गीताला आमच्याकडून नमन केलं आहे, आणि पुढच्या अधिवेशनात आमच्या अध्यक्षांनी म्हटले आहे की, वंदे मातरमवर आमच्या विधानसभेतही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. तसेच, वंदे मातरमच्या घोषणेवर बंदी घालण्यात आली आहे, आता फक्त भाजपचेच नारे द्यायचे का, देशाचा जयजयकार चालणार नाही का? असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावरुन, आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
वंदे मातरमवर कधीच बॅन लागलेला नाही, वंदे मातरमवर जे काही आघात झाले त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव पारित करून वंदे मातरमला कापलं आणि अर्धेच वंदे मातरम गायलं जाईल असं केलं. आज त्याच काँग्रेससोबत गळ्याला गळा मिळवून आदित्य ठाकरे रोज फिरतात, त्यांनी भाजपला नाही तर काँग्रेसला प्रश्न विचारला पाहिजे, असे देवेंद्रफडणवीस यांनी म्हटले. तसेच, भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरमचा नेहमीच सन्मान झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार भाजपात जाणार असल्याच्या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावरूनही फडणवीसांनी पलटवार केला. म्हणण्याकरिता उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे 20 आमदार आहेत, तेही भाजपच्या गळ्याला लागलेत, असं कोणाच्या म्हणण्याने होत नाही. आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन काय करायचंय? असे उत्तर फडणवीस यांनी दिले. शिवसेना शिंदेसेना आमचा मित्र पक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे, त्यामुळे मित्र पक्षाचे आमदार आम्हाला घेऊन अशा प्रकारचं राजकारण करत नाही. याउलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना भाजप आणि आमची महायुती अजून मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.