Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील 6 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारीतुकाराम मुंडे परभणीचे पालक सचिव

महाराष्ट्रातील 6 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी
तुकाराम मुंडे परभणीचे पालक सचिव 

मुंबई : खरा पंचनामा 

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा जिल्हा प्रशासनात एन्ट्री होणार आहे. मुंढेंची परभणीच्या पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांच्यासह आणखी 5 IAS अधिकाऱ्यांचीही वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पालक सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.

जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या शासन स्तरावरील (मंत्रालय स्तरावरील) प्रलंबित बाबींची तातडीने सोडवणूक करण्याकरिता तसेच शासनाचे धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजना यांची क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिव यांची नियुक्ती करण्यात येते.

शासनाचे धोरणात्मक निर्णय, प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजना यांची क्षेत्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालक सचिवांकडे असते. यासाठी त्यांना संबंधित जिल्ह्यात 3 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 4 वेळा जिल्ह्यात दौरा करणे आवश्यक असते. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे, त्याचा अहवाल सादर करणे, येत असलेल्या अडचणींवर उपाय सुचवायचे असतात.

यानुसार, यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांसाठी पालक सचिवांची नियुक्ती केली आहे. मात्र प्रशासकीय कारणास्तव यात काही अंशी बदल करण्यात आला आहे. यातच तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणीची जबाबदारी देण्यात आली आहे. या निमित्ताने मुंढेची अनेक वर्षांनंतर एखाद्या जिल्ह्याच्या प्रशासनात एन्ट्री होत आहे. मुंढे यांनी यापूर्वी सोलापूरचे जिल्हाधिकारी, नाशिक, नागपूर या महापालिकांचे आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

गडचिरोलीचे पालक सचिव म्हणून यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती केली होती. आता राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल हे गडचिरोलीचे पालक सचिव असणार आहेत.

वर्ध्याचे पालक सचिव म्हणून महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव होते. त्यांच्या जागी आता मिलिंद म्हैसकर पालक सचिव असणार आहेत.

इकबाल सिंह चहल हे मुंबई शहरचे पालक सचिव होते. पण 31 मार्च 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी कौशल्य, रोजगार नाविन्यता व उद्योजगता विभागाच्या अ.मु.स. मनिषा वर्मा यांची नियुक्ती झाली आहे.

परभणीचे पालक सचिव म्हणून जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांच्या जागी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली आहे.

मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील हे वाशिमचे पालक सचिव होते. आता मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्याकडे नवी जबाबदारी दिली आहे.

रत्नागिरीच्या पालक सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व विशेष चौकशी अधिकारी (१) श्रीम. सीमा व्यास जबाबदारी पार पाडत होत्या. पण इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज हे नवे पालक सचिव असणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.