Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नव्या ऑटो रिक्षांच्या परमिटला आजपासून ब्रेक

नव्या ऑटो रिक्षांच्या परमिटला आजपासून ब्रेक

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज, ९ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या निर्णयामुळे रिक्षा व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे स्वयं रोजगार आणि ऑटो रिक्षाच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना धक्का बसला आहे.

५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. परिवहन मंत्र्यांनी केंद्र सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारानंतर, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकारला 'मोटार वाहन अधिनियम २०१९' अंतर्गत हे अधिकार असल्याचे कार्यालयीन पत्राद्वारे कळवले आहे.

"राज्यात सध्या सुमारे १४ लाख रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी एकाच घरात अनेक परवाने देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. इतकेच नाही तर, काही परवाने बांग्लादेशी नागरिकांना अवैध रितीने दिल्याच्या तक्रारीही आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत," असे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर परवान्यांचे फेरनियोजन करणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.

ही स्थगिती कायमस्वरूपी नसून, नवीन रिक्षांना कोणत्या निकषांवर परवाने द्यावेत, याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' सुधारण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आखले जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नागरिकांना सुलभ आणि प्रदूषणमुक्त वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.