नाशिकच्या मुलीला मलेशियात पाठवण्याचा होता डाव
TCS धर्मांतर प्रकरणात 'मालेगाव लिंक'चा मोठा खुलासा
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीत गाजत असलेल्या सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (सोमवार, 27 एप्रिल 2026) नाशिक न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला.
सरकारी वकिलांनी निदा खानने पीडित मुलीचे धर्मांतर करण्यासाठी कशा प्रकारे जाळे विणले होते, याचे एकामागून एक धक्कादायक पुरावे कोर्टासमोर ठेवले. या प्रकरणाची व्याप्ती आता केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून त्याचे धागेदोरे मालेगाव आणि थेट मलेशियापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.
सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, निदा खान आणि इतर आरोपींनी पीडित महिलेचे धर्मांतर करण्यासाठी तिला बुरखा दिला होता. इतकेच नाही तर तिला इस्लाम धर्माची माहिती देणारी पुस्तके आणि मोबाईलमध्ये धार्मिक शिकवण देणारी अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करून दिली होती.
निदा खान पीडितेला तिच्या घरी नेऊन नमाज पठण करण्याचे, हिजाब आणि बुरखा कसा घालावा याचे रीतसर प्रशिक्षण देत होती. धक्कादायक बाब म्हणजे, धर्मांतरानंतर पीडितेचे नाव हनिया ठेवण्याचेही निश्चित करण्यात आले होते. तपासादरम्यान पीडितेच्या मोबाईलमध्ये अनेक इस्लामिक रील्स, युट्यूब लिंक्स आणि इन्स्टाग्राम पोस्टचे पुरावे सापडले आहेत.
या प्रकरणातील दुसरा आरोपी दानिश शेख याने पीडितेची शैक्षणिक आणि महत्त्वाची कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती. ही कागदपत्रे मालेगाव येथील एका पार्टीकडे देऊन पीडितेच्या नावात बदल केला जाणार होता. तसेच पीडितेला मलेशिया येथे नोकरीसाठी इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याची तयारीही सुरू होती. या संपूर्ण कटासाठी निदा खानला कोणी आर्थिक मदत केली का, यामागे काही देशविघातक शक्ती आहेत का, याचा तपास करणे अद्याप बाकी असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, निदा खान सध्या फरार असून तिचा मोबाईल जप्त करणे आणि तिने आणखी किती मुलींसोबत असे प्रकार केले आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जर तिला जामीन मिळाला, तर ती साक्षीदारांवर दबाव आणू शकते. सध्या न्यायालयाने निदा खानला कोणतेही संरक्षण दिलेले नाही, त्यामुळे पोलीस तिला कधीही अटक करू शकतात. या सर्व युक्तीवादानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला असून, येत्या 2 मे रोजी यावर अंतिम निकाल दिला जाणार आहे.
दुसरीकडे, निदा खानच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तीवाद केला की, महाराष्ट्रात अद्याप स्वतंत्र धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात नाही. ज्या घटना सांगितल्या जात आहेत त्या 2022 ते 2023 या काळातील आहेत. एकाच गुन्ह्यातून इतर तपास केला जाऊ शकतो, असे सांगत त्यांनी निदा खानच्या अटकेला विरोध केला. केंद्राचा कोणताही धर्मांतर विरोधी कायदा नसल्याने कोणत्या आधारावर ही कारवाई केली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.