नीट घोटाळ्यासह 'या' 5 मुद्द्यांवर विरोधक होणार आक्रमक
'इंडिया' आघाडीच्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत पार पडलेली विरोधी पक्षांच्या 'इंडिया' (INDIA) आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत केंद्र सरकारला विविध आघाड्यांवर घेरण्याचा ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधकांमध्ये महत्त्वपूर्ण 5 मुद्द्यांवर पूर्ण सहमती झाल्याची घोषणा केली. यामध्ये देशातील 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणापासून ते आगामी निवडणुकांच्या निष्पक्षतेपर्यंतच्या अनेक गंभीर विषयांचा समावेश आहे.
देशातील निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता कायम राखण्यासाठी 'इंडिया' आघाडीने कायदेशीर आणि घटनात्मक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. 'एसआयआर' आणि मतदार याद्यांमध्ये होणारी कथित हेराफेरी तसेच निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत विरोधकांचे एक शिष्टमंडळ भारताच्या मुख्य न्यायाधीशांना लवकरच एक विशेष पत्र सुपूर्द करणार आहे.
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या 'नीट' (NEET) आणि 'सीबीएसई' (CBSE) परीक्षांमधील कथित घोटाळ्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात देशातील तरुण पिढीचा विश्वासघात झाला असून लाखो विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यावर सर्व 23 पक्षांचे एकमत झाले आहे.
देशातील बिघडत चाललेली आर्थिक स्थिती, वाढती बेरोजगारी, गगनाला भिडलेली महागाई, सर्वसामान्यांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न यांवर 'इंडिया' आघाडी सातत्याने आवाज उठवत राहणार आहे. या जनहिताच्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ एक 'सर्वपक्षीय बैठक' बोलवावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
आघाडीमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी 'इंडिया' ब्लॉकचे सर्व घटक पक्ष आता दर 2 महिन्यांनी एकत्र येऊन चर्चा करणार आहेत. या नियोजनानुसार, आघाडीची पुढील अत्यंत महत्त्वाची बैठक आगामी ऑगस्ट महिन्यात हैदराबाद येथे पार पडणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आगामी मान्सून अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला एकत्रितपणे कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. संसद सत्र सुरू असताना दररोज सकाळी 'विरोधी पक्षनेत्यांच्या' कार्यालयात सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक घेतली जाईल, जेणेकरून सभागृहात एकजुटीने मुद्दे मांडता येतील.
मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीच्या सुरुवातीच्या भाषणात सर्व पक्षांना संबोधित करताना सांगितले की, मोदी सरकारकडून देशातील लोकशाही आणि संविधानावर सातत्याने हल्ले सुरू आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी विरोधकांनी अधिक शक्तिशाली होणे गरजेचे आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 17 एप्रिल रोजी महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन) संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाविरोधात विरोधकांनी जी अभूतपूर्व एकजूट दाखवली होती, तशीच वज्रमूठ यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.