"ते काही चुकीचं मागत नाहीत"; मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या या आंदोलनासंदर्भात कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत दिपके म्हणाले, "जेव्हा सरकार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देण्यात अपयशी ठरते, तेव्हाच एखाद्याला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागतो. जरांगे पाटील मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षण आणि रोजगाराचा मूलभूत हक्क मागत आहेत, यात काहीही चुकीचे नाही. जरांगे सर स्वतः दिल्लीत आंदोलनाला आले होते, त्यामुळे मी नक्कीच त्यांची भेट घेऊन पाठिंबा देणार आहे."
"जेव्हा एखादा व्यक्ती आंदोलन करतो तेव्हा त्याच्या समोरचं ते लास्ट ऑप्शन असतं तिथं सरकार त्यांना भाग पाडतं. जर सरकारने समाजाच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं असतं आणि रोजगाराचे संधी दिली असती तर मनोज जरांगे सरांना आंदोलन करावा लागला असता का?" असा सवाल दिपकेंनी केला.
"मनोज जरांगे पाटील काही चुकीचं मागत नाहीत, मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार मागत आहेत, रोजगाराचा अधिकार मागत आहेत. याची गरज यासाठी पडली आहे की सरकार त्या दोन गोष्टीवर पूर्णपणे अपेक्षित ठरले आहे. मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण, रोजगाराची संधी मिळत नाही. हे सरकारचं अपयश आहे की त्यांना आंदोलन करावं लागत आहे."
“आम्हाला जंतर-मंतरवर जसं 35 दिवस सरकारने बसून ठेवलं होतं. मनोज जरांगे सरांसोबत तुम्ही असं करु नका, त्यांच्याशी तात्काळ चर्चा करून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढा," असे दिपके यांनी म्हंटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.