भोंदू अशोक खरातविरोधात ईडीने फास आवळला!
कोर्टात सादर केले नवे पुरावे
नाशिक : खरा पंचनामा
भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात धक्कादायक नवे पुरावे सादर केले आहेत. या पुराव्यांमधून भक्तांची दिशाभूल करून तथाकथित दैवी वस्तू आणि रत्नांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अधिक बळकट झाल्याचे समोर आले आहे.
ईडीने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, केवळ सुमारे एक हजार रुपये किमतीच्या पुष्कराज आणि डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना तब्बल २.६२ लाख रुपयांना विकण्यात आली. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या या अंगठ्या बनावट असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याशिवाय, चिंचेच्या बिया केवळ १०० रुपये प्रति किलो दराने खरेदी करून त्या १० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत विकल्या गेल्याचा दावा ईडीने केला आहे. तसेच ३०० ते ५०० रुपये प्रति लिटर किमतीचा मध 'दैवी मध' असल्याचा दावा करत तब्बल ७ लाख रुपये प्रति लिटर दराने विकण्यात आल्याची माहितीही न्यायालयात सादर करण्यात आली.
तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, ग्रहदोष दूर करणारी, नशीब उजळवणारी आणि यश मिळवून देणारी 'ऊर्जित रत्ने' असल्याचा दावा करून लाखो रुपयांना रत्नांची विक्री करण्यात आली. या सर्व वस्तूंना दैवी शक्ती असल्याचे भासवून भक्तांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीने सादर केलेल्या या नव्या पुराव्यांमुळे अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणातील पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.