ग्रामपंचायत निवडणुकांना SIRचा ब्रेक!
महाराष्ट्रात निवडणुका पुढे ढकलल्या जाणार; 'या' कालावधीत होण्याची शक्यता
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वाची घडामोडी समोर येत आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत नागरिकांच्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यक्रमाला विलंब होत असून, नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या शेवटी ग्रामपंचायत निवडणुकांची अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान आणि नवीन लोकप्रतिनिधींची निवड यासाठी गावकऱ्यांना जानेवारी 2027 पर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे तेथे सध्या निवडून आलेली कार्यकारिणी अस्तित्वात नाही. यामुळे गावातील महत्त्वाचे प्रकल्प आणि दैनंदिन विकासकामे रखडली आहेत. निवडणुकीला होणारा उशीर विचारात घेऊन, ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाज ठप्प होऊ नये म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुढील 6 महिने किंवा नवीन निवडणुका होईपर्यंत प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गावपातळीवरील विकासकामे वेगाने पूर्ण व्हावीत आणि स्थानिक कारभार सुरळीत चालावा, यासाठी निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. आता 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीनंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम कसा जाहीर करतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.