राजू शेट्टींना विरोधामुळे ठाकरेंनी कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाला हटविले
मुंबई : खरा पंचनामा
दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यंची भेट घेतली होती. याला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी विरोध करत शेट्टींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका, अशा शब्दांत विरोध केला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे.
अदानी समुहाच्या प्रकल्पांविरोधातील शेट्टींच्या जनआंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा मिळविण्यासाठी भेट घेतल्याचे शेट्टींनी जाहीर केले होते. यावरून जाधव यांनी राजू शेट्टींवर गंभीर आरोप केला होता. 2014 ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले, असा आरोप जाधव यांनी केला होता. राजू शेट्टींनी ठाकरेंसोबत गद्दारी केली होती, असेही ते म्हणाले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे. पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. २००५ मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो. आताही तुमच्यासोबत राहिलो. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल, असे जाधव म्हणाले होते. जाधव यांची हकालपट्टी करतानाच वैभव उगले व संजय चौगुले यांची नवीन जिल्हाप्रमुख म्हणून घोषणाही करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.