मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांवर सरन्यायाधीश गवई भडकले
मुंबई : खरा पंचनामा
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा रविवारी मुंबईत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर ते रविवारी पहिल्यांदाच मुंबईत आले. पण यावेळी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वागण्यावरून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रमामध्ये भाषणाच्या शेवटी सरन्यायाधीश गवई यांनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. लोकशाहीचे तीन स्तंभ म्हणजे, न्यायपालिका, विधीपालिका आणि कार्यपालिका हे समान आहेत, असे आपण म्हणतो. संविधानाच्या प्रत्येक घटकाला इतर घटकांकडून आदर मिळायला हवा, असे सुरूवातीलाच सरन्यायाधीशांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना किंवा महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना किंवा मुंबई पोलिस आयुक्तांना तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबाबत त्यांनीच विचार करावा, अशी नाराजी सरन्यायाधीशांनी उघडपणे व्यक्त केली.
मला प्रोटोकॉलचे बिल्कुलही काही वाटत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी अमरावती, नागपूरला जातो तेव्हा सोबत कुणी नसते. सुप्रीम कोर्टात जाण्याआधी मी अमरावती मित्रांच्या मोटारसायकलवरून फिरायचो. परंतु, न्यायव्यवस्थेविषयी संविधानाच्या इतर संस्थांना असलेल्या आदराविषयीचा प्रश्न आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळी पहिल्यांदा या राज्यात येत असेल आणि तोही त्याच राज्याचा... त्यांनी दिलेली ही वागणूक योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान गोष्टींमध्ये मला वेळ नाही, अशी भावना सरन्यायाधीशांना व्यक्त केली. माझ्या जागी दुसरे कोणी असते तर आर्टिकल 142 किंवा... असे म्हणून ते थांबले. या लहानसहान गोष्टी आहेत, पण मी उल्लेख यासाठी केला की लोकांना कळले पाहिजे, असे सांगत सरन्यायाधीशांनी आपले भाषण संपवले.
दरम्यान, सरन्यायाधीशांनी आपल्या भाषणात अनेक किस्सेही सांगितले. सरन्यायाधीश होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास सांगताना व्यासपीठावर बसलेल्या त्यांच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, मुंबई हायकोर्टातील न्यायाधीश, बार कौन्सिलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्यासमोरच सरन्यायाधीशांनी आपली नाराजी व्यक्त केल्याने हा चर्चेचा विषय बनला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.