प्रधान सचिव पदावर कार्यरत असलेल्या चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पदोन्नती
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून गेल्या आठ महिन्यात सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. राज्य सरकारने आतापर्यंत आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या केल्या आहेत.
मात्र आता प्रशासकीय संरचना अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महाराष्ट्र सरकारने 1995 च्या बॅचमधील चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (एसीएस) पदावर बढती दिली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (05 सप्टेंबर) जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महत्त्वाच्या विभागांमध्ये दिलेले ज्येष्ठता, अनुभव आणि प्रशासकीय योगदान लक्षात घेऊन या पदोन्नती देण्यात आल्या आहेत.
बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव अश्विनी भिडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि गृह विभागाच्या (अपिल आणि सुरक्षा) प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच मंत्रालयातील काही वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत.
दरम्यान, राजगोपाल देवरा यांच्या सेवानिवृत्तीनंतर नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार सध्या वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर वल्सा नायर सिंह यांच्या सेवानिवृत्तीपासून गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याकडे आहे. त्यामुळे नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, गृहनिर्माण या खात्यांना लवकरच पूर्णवेळ अधिकारी दिला जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.