"भाजपलाही एक्सपायरी डेट, मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही"
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीची चर्चा सुरु आहे.
दैनिक सामनाला दिलेल्या या मुलाखतीच्या उत्तरार्धात ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार शब्दांत टीका केली. यावेळी मुंबई, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचे भवितव्य आणि भाजपच्या राजकारणावर ठाकरे बंधूंनी अत्यंत परखड भूमिका मांडली. भाजपलाही एक एक्सपायरी डेट असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगत, सध्याची सत्ता शाश्वत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मराठी माणसाने आता आपापसातील भांडणं, मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
जोपर्यंत सूर्य-चंद्र तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या हातात मुळात काहीच नाही. इच्छा चांगली असू शकते, पण दिल्लीहून जे आदेश येतील, तेच त्यांना पाळावे लागतात," असा घणाघात त्यांनी केला. वरून सांगितले की ही जमीन अदानीला द्यायची, तर सही करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नसतो, असे विधान करत त्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"सत्तेचा सगळा कारभार 'Obey the Order' या एका तत्वावर चालतो. त्यामुळे मुख्यमंत्री सूर्य-चंद्राचे दाखले कितीही दिले, तरी खरी चिंता दिल्लीमधील सत्ताधाऱ्यांच्या मनात काय? हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. इथल्या लोकांच्या मनात काय आहे, हा विषयच कोणाला महत्त्वाचा वाटत नाही," अशी टीकाही त्यांनी केली. मोदी-शहा या 'वर बसलेल्या दोघांच्या' विचारांनुसारच निर्णय होत आहेत." अशी टीका त्यांनी यावेळी केली.
बुलेट ट्रेनच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. मुंबईपासूनचा भुगोल नीट अभ्यासलात तर बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे हे लक्षात येईल असे दोघांनी सांगितले. बुलेट ट्रेनला सगळ्यांनीच विरोध केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तर बुलेट ट्रेन जिथून अहमदाबादला जाणार आहे. तो ठाणे, पालघर हा जो सगळा भाग आहे. हा सगळा तेवढा पट्टा बरोब्बर गुजरातला लागून आहे. पालघरमधल्या दोन खेड्यांवर आता गुजरात दावा सांगत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. हा धोका ओळखण्याचे आवाहन दोन्ही बंधुंनी केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.