मणिपूरची राष्ट्रपती राजवट संपुष्टात!
वाय. खेमचंद सिंह यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
इंफाल : खरा पंचनामा
मणिपूरमधील प्रदीर्घ राजकीय अनिश्चितता आणि वांशिक हिंसाचारानंतर अखेर बुधवारी मणिपूरला नवीन मुख्यमंत्री मिळाले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले वाय. खेमचंद सिंह यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मागील वर्षी ९ फेब्रुवारी रोजी एन. बीरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतर लागू झालेली राष्ट्रपती राजवट आता संपुष्टात आली आहे. मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये मे २०२३ मध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारामुळे मणिपूर धुमसत होते.
या हिंसाचाराला आटोक्यात आणण्यात अपयश आल्याचा आरोप करत विरोधकांनी आणि सत्ताधारी पक्षातीलच काही गटांनी एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अखेर अंतर्गत कलह आणि वाढता दबाव लक्षात घेता बीरेन सिंह यांनी गेल्या वर्षी आपल्या पदाचा त्याग केला होता.
त्यानंतर कोणताही सर्वसंमत चेहरा समोर न आल्याने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करत विधानसभा निलंबित ठेवण्यात आली होती. दरम्यान, नवनियुक्त मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यींची मंगळवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, या बैठकीत कुकी समुदायातील आमदारांनीही सहभाग घेतला होता. ६० सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे ३७ आमदार असून एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट यांसारख्या मित्रपक्षांच्या पाठिंब्याने नवीन सरकार राज्याचा कारभार सांभाळणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.