'मी जोपर्यंत सोबत, तोपर्यंत मोदी हे पंतप्रधान'
धुळे : खरा पंचनामा
रिपाई नेते रामदास आठवले यांना पुन्हा एकदा राज्यसभेची खासदारकी मिळाली. त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण लोकसभेला अजून बराच अवकाश आहे.
त्यांचा पत्ता कट होणार असे वाटत असतानाच त्यांनी अनेकांना धक्का दिला. त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. रामदास आठवले हे शीघ्र कवी आणि राजकीय टोलेबाजीत तरबेज मानले जातात. त्यातच त्यांचे एक वक्तव्य सध्या व्हायरल झाले आहे. राजकीय टोलेबाजी करता करता धुळ्यात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे.
रामदास आठवले हे धुळे दौऱ्यावर होते. राज्यसभेवर वर्णी लागल्यावर शनिवारी ते धुळ्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकात राज्यमंत्री रामदास आठवले यांची सभा झाली. मी संसदेत बसून चारोळ्या करतो. त्यामुळे आज माझे जगभरात फॅन तयार झाले आहेत. माझी लोकप्रियता सतत वाढत आहे. मी ज्यांच्यासोबत असतो ते सत्तेत असतात. मी सोबत असलो की त्या पक्षाला 100 टक्के सत्ता मिळते, हा आजवरचा पायंडा आहे. त्यात बदलाची शक्यता अजिबात नाही, असा दावा आठवले यांनी केला.
जोपर्यंत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी मंत्री असेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा लवकरच राष्ट्रीय पक्ष होणार आहे. भाजपला आमच्या पक्षाची मदत होते. मी त्यांच्यासोबत जोपर्यंत आहे, तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी या सभेतून केले. त्याची एकच चर्चा सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयारी केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत याबाबत खोटे नॅरेटीव्ह सेट केले होते. त्याचा फटका निवडणुकीत बसला. आता मात्र विरोधकांना केंद्रात सत्तेत येण्याची कोणताही संधी मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व समाजांचा पाठिंबा असलेले नेते आहेत. ते अतिशय चांगला कारभार करत असल्याचे आठवले म्हणाले. भारतीय संविधान सर्वसामावेशक आणि व्यापक हेतू असलेले आहे. त्यामुळे भारताची स्थिती कधीही श्रीलंका, बांगालदेश आणि नेपाळ या देशांसारखी होणार नाही. या सभेला माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आरपीआय नेते बाबुराव कदम, सुधाकर जाधव आदींची उपस्थिती होती.
धुळे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा कार्यकर्ता मेळावा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. रिपब्लिकन चळवळीची विचारधारा अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालत वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी काम करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.