अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून आमदार - मंत्र्यांमध्ये जुंपली
मुंबई : खरा पंचनामा
राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी (ता. 16 मार्च) चौथ्या आठवड्यातील कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभेत सार्वजनिक बांधकाम, उद्योग - ऊर्जा - कामगार व खनिकर्म, ग्रामविकास, आदिवासी विकास, सहकार - पणन व वस्त्रोद्योग, उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
या चर्चेला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुरुवात केली. प्रभू यांनी सुरुवात केल्याच्या काही वेळानंतर ते मागण्या मांडत असलेल्या विभागाशी संबंधित मंत्री सभागृहात नसल्याने संताप व्यक्त केला. सर्व काही बट्ट्याबोळ करून ठेवले आहे, म्हणत प्रभू आक्रमक झाले. यानंतर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे आमदार अर्जुन खोतकर, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही उपस्थित मंत्र्यांना खडेबोल सुनावले. मात्र, त्यांच्या आक्रमकपणाला समोरील बाकावर बसलेल्या मंत्र्यांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिले.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार सुनील प्रभू यांनी सभागृहात अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा करण्यास सुरुवात केली. यावेळी ते कामगार विभागाच्या मागण्यांवर बोलत असताना त्या ठिकाणी मंत्री उपस्थित नसल्याने सुनील प्रभू यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी कामगार मंत्री नाहीत, मग मी कशाला बोलू? असा प्रश्न उपस्थित केला. बांधकाम मंत्री नाही, मग आम्ही कशाला बोलायचे? अर्थसंकल्प तुम्ही मंजूर करून घेणार. विरोध पक्षाचे काही गांभीर्य आहे की नाही? आमचं कोण ऐकतंय? मंत्री नाही, आम्ही कशासाठी बोलत आहोत? कशासाठी माहिती घेत आहोत? सर्व बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. कपात सूचनांना उत्तर सुद्धा चुकीचे देतात. कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करा, असे म्हणत सुनील प्रभू आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.