Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अन्नपदार्थ, दूध भेसळ प्रकरणी अवघी एकच नोंदणी रद्द!राज्यातील १६७ परवाने निलंबित

अन्नपदार्थ, दूध भेसळ प्रकरणी अवघी एकच नोंदणी रद्द!
राज्यातील १६७ परवाने निलंबित

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यात अन्नपदार्थ तसेच दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू असल्याने गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असतानाच अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) राज्यात फक्त एका परवान्याची नोंदणी रद्द करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही माहिती विधानसभेत दिली. राज्यात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असताना एफडीएकडून केवळ दिवाळी आणि सणांच्या कालावधीत खवा व मावा यांचीच तपासणी केली जाते.

तसेच ही कारवाईही अनेकदा अर्धवटच सोडली जाते. याशिवाय दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असून केमिकलयुक्त पनीर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असल्याने राज्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यासाठी एफडीए जबाबदार असल्याचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणी शासन काय कारवाई करणार, असा प्रश्न आमदार सुनील कांबळे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर मंत्री झिरवळ यांनी ही माहिती दिली.

झिरवळ म्हणाले की, राज्यात आतापर्यंत एफडीएकडून सुमारे १२ हजार ६९३ कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५ हजार ७७६ प्रकरणांमध्ये सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत. १६७ परवाने निलंबित करण्यात आले असून एका प्रकरणात नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

तसेच ८४० प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली असून संबंधितांना ७५ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

दुधात मोठ्या प्रमाणात होत असलेली भेसळ तसेच केमिकलपासून तयार करण्यात येणाऱ्या पनीरच्या प्रकरणावर उद्या (शुक्रवारी) सभागृहातील वरिष्ठ आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस आमदार सुनील कांबळे यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवळ यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.