खेळामुळे शरीर आणि मन सुदृढ होते
जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांचे प्रतिपादन
पूजा फडके
सातारा : खरा पंचनामा
रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा या महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून साताऱ्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी तारळकर यांनी दैनंदिन जीवन आणि शिक्षण क्षेत्रातील खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, "मैदानावर खेळताना विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना आणि परस्पर सहकार्याची वृत्ती विकसित होते. खेळामुळे केवळ शरीरच नव्हे तर मनही सुदृढ होते, ज्याचा उपयोग जीवनात कायमस्वरूपी होतो. या महाविद्यालयातील भावी शिक्षक उद्याचे सुजाण नागरिक घडवणार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः तन-मनाने निकोप आणि निरोगी राहून विद्यादानाचे कार्य करावे." याविषयी मार्गदर्शन केले.
या क्रीडा महोत्सवात कबड्डी, डॉजबॉल, धावणे, संगीत खुर्ची, कॅरम, बुद्धिबळ आणि व्हॉलीबॉल अशा विविध मैदानी व बैठे खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि खिलाडूवृत्तीने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वंदना नलवडे होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून खेळाचे महत्त्व स्पष्ट करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. या महोत्सवासाठी सुधीर खरात यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. शोभा पाटील यांनी चोखपणे पार पाडले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.