Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्मवीर पतसंस्थेच्या सहा संचालकांचे राजीनामे माजी चेअरमन रावसाहेब पाटील यांचाही समावेश

कर्मवीर पतसंस्थेच्या सहा संचालकांचे राजीनामे 
माजी चेअरमन रावसाहेब पाटील यांचाही समावेश 

सांगली : खरा पंचनामा 

सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहा संचालकांनी संचालक पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये संस्थेचे माजी चेअरमन रावसाहेब पाटील यांचाही समावेश आहे.

राजीनामा दिलेल्यामध्ये रावसाहेब जिनगोंडा पाटील,  डॉ. अशोक आण्णा सकळे,  वसंतराव धुळाप्पाणा नवले,  डॉ. एस. बी. पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील,  अमोल विनायक रोकडे यांचा समावेश आहे.

या सहाही संचालकांनी संयुक्तपणे एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही खाली सही करणार माजी संचालक, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था सांगलीच्या संचालक मंडळाच्या सदस्यत्वाच्या राजीनामा दिल्याने वेळोवेळी उपस्थित होत असलेल्या प्रश्नांना वस्तुनिष्ठ परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी आम्ही लेखी स्वरूपात आमचे निवेदन प्रसिद्ध करीत आहोत.

आम्ही गेली कित्येक वर्षे कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून काम करून विविध पदेही भूषवली आहेत. आम्ही जवळपास सर्वच संचालक संस्था स्थापनेपासून संस्था उभारणीचे काम केले आहे. संस्था १९८७ साली स्थापन होऊन सध्या संस्थेचे हेड ऑफिस व मुख्य शाखेसह ६८ शाखा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. संस्थेच्या ठेवी जवळपास १२४५ कोटी इतक्या असून संस्थेचे कर्ज वाटप ९८० कोटी आहे. वेळोवेळी संस्थेचे सहकार खात्याकडून लेखापरीक्षण झालेले आहे. प्रत्येक वर्षी संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल प्रसिद्ध करून जनरल सभेत मान्यताही आलेली आहे. संस्थेच्या उभारणीस आम्ही अविरत प्रयत्न करून जिल्ह्यात नाव लौकिक मिळवला असून ३१.३.२०२५ अखेर एनपीए टक्केवारी 1.84% होता व ढोबळ नफा २६ कोटी ६४ लाख इतका आहे.

जुलै २०२५ मध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची नवनियुक्ती झालेली आहे. तेही संस्था सक्षमपणे सांभाळत असल्याचे दिसून येते. मात्र संस्थेच्या काही सभासदांमधील काहींना संचालक मंडळ पदावर काम करावे अशी इच्छा बाळगून काही समाजसुधारकांना खोटी व अयोग्य माहिती पुरवून संस्थेकडून कागदपत्रे परस्परपणे मिळवून संचालक अपात्र असल्याचा कांगावा सुरू केला.

आमचे कोणतेही कर्ज थकित नाही व मार्च २०२६ अखेर काही कर्ज खाती फेडही झालेली आहेत. मात्र संचालक अपात्र आहेत अशी खोटी बातमी पेरणी करून सभासदांमध्ये, ठेवीदार व कर्जदार यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने व या गोंधळामुळे संस्थेच्या हितास बाधा येऊ नये व वाद अधिक चिघळून संस्थेच्या हितास बाधा येईल असे कृत्य कोणाकडूनही होऊ नये, सभासद व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित रहाव्यात म्हणून त्या वादावर पडदा टाकणेसाठी व वाद संपुष्टात आणणेसाठी आम्ही खालील संचालकांनी स्वइच्छेने, संस्थेच्या हिताचा विचार करून आम्ही आमच्या संचालक पदाचा राजीनामा सुपूर्द केला असून तो संस्थेने मंजूरही केला आहे.

ज्या ज्या वेळी संस्थेच्या हितास बाधा येईल असे कृत्य कोणाकडूनही घडत असलेस आम्ही संस्थेच्या हिताचा विचार करून पुन्हा संस्थेचा कारभार, देखभाल करण्यासाठी पुन्हा यावे लागल्यास ते आम्ही सक्षमपणे पार पाडू, अशी खात्री आम्ही आमच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांना देत आहोत, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.