दोषी, चौकशीसाठी आलेल्या आमदार-खासदारांसाठी उभे राहू नका!
राज्य सरकारने काढला सुधारित आदेश...
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील खासदार, आमदारांना शासकीय कार्यालयांमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, यासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
तसा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. आमदार-खासदार भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
राज्य सरकारने मंगळवारी याबाबत सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. मागील वर्षीच्या २० नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी अथवा इतर प्रकरणात दोषी ठरला असल्यास, चौकशी किंवा सुनावणीसाठी अपीलकार, पक्षकार म्हणून बोलाविण्यात आले असल्यास उभे राहून अभिवादन करण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
आमदार-खासदार निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयात उपस्थित राहिले असल्यास, अशा प्रसंगी विधानमंडळ किंवा संसद सदस्य भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करण्याची आवश्यता नाही, असेही मंगळवारी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
अशाप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणताही भेदभाव न करता, कायदा, नियम व परिस्थितीनुरूप सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच लोकप्रतिनिधींना वागणूनक देणे अपेक्षित असल्याचे सरकारने म्हटले आहे.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी हा शासन निर्णय जारी केला आहे. सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, कार्यालय प्रमुख, शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, मंडळे, महामंडळे, शासन नियंत्रित व तत्सम संस्थांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.