कधीच विसरू शकणार नाही, अशी पोलिसांकडून भेट!
12 वर्षापूर्वी हरवला, ईदच्या दिवशी सापडला
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील मुंबई पोलीस यांच्या मालाड पोलीस ठाण्याने ईदच्या निमित्ताने एका कुटुंबाला आयुष्यभर लक्षात राहील अशी अनोखी भेट दिली. तब्बल 12 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या मुलाचा शोध घेत पोलिसांनी त्याची आपल्या आई-वडिलांशी पुन्हा भेट घडवून आणली. ईदच्या दिवशी झालेल्या या भावनिक पुनर्भेटीमुळे संपूर्ण परिसरात हळहळ आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या भिक्षेकरू कारवाई मोहिमेदरम्यान पोलिसांना एक 27 वर्षीय तरुण आढळून आला. सुरुवातीला विचारणा केली असता त्याने स्वतःचा पत्ता उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्या बोलण्यात काहीतरी दडवले जात असल्याचा संशय आला.
यानंतर पोलिसांनी संयमाने त्याच्याशी संवाद साधला आणि त्याचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्या तरुणाने आपला खरा पत्ता सांगितला. त्याने आपण साकीनाका येथील टिळक नगर परिसरात, अंजुमन इस्लाम उर्दू स्कूलजवळ राहत असल्याची माहिती दिली.
यानंतर मालाड पोलिसांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित तरुण तब्बल 12 वर्षांपूर्वी घरातून बेपत्ता झाला होता. दुसरी इयत्तेत नापास झाल्यानंतर भीतीपोटी त्याने घर सोडल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला होता, मात्र त्याचा शोध लागला नव्हता. कालांतराने त्याचे आई-वडीलही मुंबईतील मुंब्रा परिसरात नातेवाईकांच्या शेजारी राहायला गेले होते.
मालाड पोलिसांनी तत्काळ त्या तरुणाच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. ईदच्या दिवशी तब्बल 12 वर्षांनंतर आई-वडिलांसमोर मुलगा उभा ठाकल्याने सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.