अन्नबाधा नव्हे विष देऊन मारलं?
कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांकडून धक्कादायक खुलासा
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील पायधूनी परिसरात रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं आहे.
अन्न विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र आता या प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. आता पोलीस तपासात आणि वैद्यकीय अहवालात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार जणांचे मृत्यू अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे नाही, तर थेट त्यांना विष देऊन मारलं असावं, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणातील सर्वात खळबळजनक खुलासा म्हणजे, पीडितांपैकी एकाच्या शरीराच्या तपासणीत 'मॉर्फिन'चे अंश आढळले आहेत. यामुळे पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही चक्रावून गेली आहे. सामान्यतः कलिंगड किंवा कोणत्याही फळाच्या अन्नातून होणाऱ्या विषबाधेमध्ये अशा प्रकारचे घातक फळाच्या अन्नातून होणाऱ्या विषबाधेमध्ये अशा प्रकारचे घातक अमली पदार्थ किंवा घटक आढळत नाहीत. त्यामुळे हा अपघात नसून घातपात तर नाही ना, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) प्राथमिक अहवालानुसार, या प्रकरणात फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. कलिंगड नैसर्गिकरित्या इतके विषारी होऊ शकत नाही की ज्यामुळे चार जणांचा बळी जाईल. दरम्यान, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) सविस्तर अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतरच विष नेमके कोणत्या स्वरूपाचे होते आणि ते शरीरात कसे पोहोचले? याचं चित्र स्पष्ट होईल.
पीडितांच्या शरीरात हे विष कुठून आलं? कलिंगडात जाणीवपूर्वक विष मिसळण्यात आलं होतं का? की अन्य कोणत्या मार्गाने ते त्यांच्या शरीरात पोहोचले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून पीडितांच्या कुटुंबाशी संबंधित लोकांचा आणि कलिंगड विक्रेत्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील गूढ आता अधिकच वाढत असून हा सगळा नियोजित कटाचा भाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.