बलात्कार प्रकरणात आसाराम बापूची जन्मठेप कायम, उच्च न्यायालयाचा दोन सहआरोपींना दिलासा
जयपूर : खरा पंचनामा
स्वयंघोषित गुरु आसाराम बापूची जन्मठेपेची शिक्षा राजस्थान उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. आसाराम बापूसाठी हा मोठा झटका मानला जातो आहे. २०१३ मध्ये आसाराम बापूने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या मुलीने आवाज उठवल्यानंतर आसाराम बापूला अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
आसाराम बापूच्या विरोधात कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जोधपूरच्या विशेष बाल न्यायालयाने आसारामला एप्रिल २०१८ मध्ये IPC कलम ३७६ (फ), कलम ३७६ (ड) सामूहिक बलात्कार, ३७० (४) मानवी तस्करी, ५०६ धमकी देणं, १२० ब गुन्ह्याचा कट रचणं या आरोपांखाली दोषी ठरवत जन्मठेप सुनावली होती. या निर्णयाविरोधात आसारामाने राजस्थानच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्याला कुठलाही दिलासा दिलेला नाही. उच्च न्यायालयाने सामूहिक बलात्कार आणि कट रचणं या दोन गुन्ह्यांमधून त्याला दिलासा दिला आहे. मात्र जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे आणि आसारामने तातडीने तुरुंगात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील आसारामचे सहआरोपी शरद आणि शिल्पी यांची तुरुंगातून सुटका केली आहे. या दोघांवर पीडितेची भेट आसारामची घालून दिल्याचा आणि कट रचल्याचा आरोप होता.
आसाराम बापूची जन्मठेप कायम ठेवताना न्यायालयाने हे म्हटलं आहे की भारतीय न्याय संहितेनुसार बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचे आसारामवर झालेले आरोप हे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे त्याला जामीन मिळण्याचा किंवा शिक्षेतून सूट मिळण्याचा प्रश्नच येत नाही. त्याची जन्मठेप कायम ठेवली जाते आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.