"पंतप्रधानांचा आदेश मानून गाड्यांची संख्या कमी करा, फक्त एक गाडी अन् एक अंगरक्षक..."
मुंबई : खरा पंचनामा
आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशावर भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले होते.
यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केलीय.
जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या... वाजवल्या. दिवे लावायला सांगितले तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही.
त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण 20-30 गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात. प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच... पण सत्ताधाऱ्यांनीही "राष्ट्र प्रथम" हे धोरण कृतीत उतरवावे असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आपण सगळेच पहिल्या दिवसापासून बोलत आहोत की, आजच्या परिस्थितीवर त्यांनी बोलावं. आता 5 राज्यातील निवडणूक झाल्यावर ते बोलत आहेत, त्यांच्या मंत्र्यांचा ताफा कमी करणार आहात का? जनतेने सर्व काही करावं तर सरकारने काय करावे, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तर, अमित साटम यांनी 25 गाड्यांचा ताफा घेऊन पाहणी केली. त्यावरुन, आदित्य ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. स्वतः सोबत 25 गाड्या आणि कचरा काढणाऱ्या गाड्या किती? असा सवाल आदित्य यांनी विचारला. तसेच, यांना सगळ्या परवानगी दिल्लीतून घ्याव्या लागतात, असेही ते म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.