'जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत'
मुंबई : खरा पंचनामा
मुंब्रा-भेंडी बाजारात जाऊन विरोध करा' मुंबई-मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. 'जैन समाज शांतताप्रिय आहे, पण याचा अर्थ जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत,' असे म्हणत त्यांनी जैन बांधवांना संयम राखण्याचे आवाहन केले.
निलेश चंद्र मुनी म्हणाले की, संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यांमुळे दोन समाजांमध्ये अनावश्यक दरी निर्माण होत आहे. जैन समाज हा नेहमीच शांततेचा मार्ग स्वीकारणारा समाज आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी न पडता जैन बांधवांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. 'तुम्ही जर खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असाल, तर हे लक्षात ठेवा की बाळासाहेब ठाकरे यांनी जैन आणि मारवाडी समाजावर नेहमीच प्रेम केले. त्यांनी कधीही या समाजांना त्रास दिला नाही,' अशी आठवणही त्यांनी करून दिली.
यावेळी निलेश चंद्र मुनी यांनी संदीप देशपांडेंना थेट आव्हान दिले. 'जर तुम्हाला खरंच रस्त्यांवरील धार्मिक प्रथा खटकत असतील, तर मुंब्रा, भेंडी बाजार किंवा पायधुनी भागात जा. ईद किंवा नमाजवेळी रस्त्यांवर पांढरे कापड टाकून लोक बसतात, त्यालाही विरोध करा,' असे ते म्हणाले. तसेच, 'मुंब्रामध्ये एका नगरसेविकेने 'मुंब्रा हिरवा करेन' असे वक्तव्य केले होते, त्याविरोधातही भूमिका घ्या. फक्त एका समाजाला लक्ष्य करून वातावरण बिघडवू नका,' असा टोला त्यांनी लगावला.
दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील जैन मंदिराजवळील लेनमध्ये पांढऱ्या रंगाचे पट्टे रंगवण्यात आल्याचा मुद्दा पुढे आला होता. यावर आक्षेप घेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महापालिकेला दुपारी ३ वाजेपर्यंत हे पट्टे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा स्वतः काळा रंग फासण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर महापालिकेने तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणांवरील पांढरे पट्टे हटवण्यास सुरुवात केली.
हा संपूर्ण वाद घाटकोपरमधील एका सोसायटीतून सुरू झाला होता. युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या सोसायटीत जैन धर्मगुरूंच्या आगमनासाठी पांढरी पट्टी रंगवण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रसाद वेदपाठक यांनी याला सार्वजनिक जागेचा धार्मिक वापर असल्याचे म्हणत विरोध दर्शवला. त्यानंतर हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आणि माध्यमांनीही तो उचलून धरला. वाढता विरोध पाहता संबंधित पांढऱ्या पट्ट्यांवर अखेर रंगकाम करण्यात आले.
घाटकोपरमधील पट्टे हटवल्यानंतर हा वाद संपल्याचे वाटत असतानाच आता दादरसह मुंबईतील इतर भागांतील अशाच पट्ट्यांवरून नवे वाद निर्माण होत आहेत. मनसे आणि जैन समाजातील शाब्दिक संघर्षामुळे हा मुद्दा आता केवळ सोसायटीपुरता मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला आहे. आगामी काळात या वादाला आणखी कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.