"कोण होतास तू, काय झालास तू... अरे वेड्या, असा वाया गेलास तू"
एकनाथ शिंदेची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
मात्र, त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत मिश्किल शैलीत "कोण होतास तू, काय झालास तू..." अशी टिप्पणी केली. तसेच जयंत पाटील आणि नाना पटोले यांनाही लक्ष्य करत "पोराटोरांच्या नादाला कशाला लागता?" असा टोला लगावला.
सभागृहाचे कामकाज अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली नियमानुसार सुरू असल्याचे सांगत शिंदे यांनी सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम असल्याचा दावा केला. एखाद्या प्रश्नावर राज्यमंत्र्यांकडून अपुरी माहिती मिळाल्यास स्वतः मंत्री, मुख्यमंत्री किंवा आपण स्वतः उत्तर देण्यासाठी पुढे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडे आता कोणतेही ठोस मुद्दे उरले नसून ते हतबल झाले आहेत, अशी टीका करत शिंदे म्हणाले, "कोण होतास तू, काय झालास तू... अरे वेड्या, असा वाया गेलास तू", अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. तसेच प्रश्न उपस्थित करून उत्तर ऐकण्यापूर्वीच सभागृहातून बाहेर पडण्याच्या भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही लक्ष्य करत शिंदे यांनी "तुम्ही इतके समजदार आहात, मग पोराटोरांच्या नादाला कशाला लागता?" असा टोला लगावला. विरोधकांनी केवळ स्टंटबाजी करून सभागृहाचा वेळ वाया घालवू नये, तर चर्चेत सहभागी होऊन सरकारची उत्तरे ऐकावीत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.