कोरोनाची पुन्हा चाहूल?
महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा
मुंबई : खरा पंचनामा
कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आरोग्य विभागाने यासंदर्भात महत्त्वाचा खुलासा करत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
आंध्र प्रदेशात २६ जून ते १६ जुलैदरम्यान कोविड-१९चे १२ रुग्ण आढळले होते. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर १ जुलै ते १६ जुलैदरम्यान आणखी ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली. मृत्यू झालेल्या चारही रुग्णांना आधीपासून गंभीर सहव्याधी होत्या, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाचे काही रुग्ण आढळल्याने नव्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, सध्या आढळणारी बहुतांश प्रकरणे सौम्य स्वरूपाची असून राज्यात कोरोनाच्या नव्या लाटेची कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२६ या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण ४८ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये जानेवारीत ३, फेब्रुवारीत १, जूनमध्ये ११ आणि जुलैमध्ये आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती स्वच्छता, हात धुण्याची सवय आणि आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले असून, सध्या घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.