Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज ठाकरेंनी जल्लोष सभेत वाचली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे

राज ठाकरेंनी जल्लोष सभेत वाचली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची नावे

मुंबई : खरा पंचनामा 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणाईच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात सुरू झालेले हे आंदोलन अखेर 36 दिवसांनंतर यशस्वी झाले आणि प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यानंतर आता याच विजयाचा जल्लोष करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जल्लोष सभा आयोजित केली. ठाकरे बंधूंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी ही सभा आयोजित केली. एका भल्या मोठ्या ट्रकवर उभे राहून ठाकरे बंधूनी भाषण केले आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हजारोंच्या संख्येने राज्यातील तरुणाई आवर्जून या झेन-जींच्या विजयी सभेसाठी उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळाले.

या सभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात प्रथम भाषण केले. या भाषणातून त्यांनी सरकारवर जहरी टीका करत जेन-झींचे अभिनंदन केले. त्याशिवाय, त्यांनी यावेळी नीटपेपरफुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांची नावे वाचून दाखवली. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणाईला आपण हा जल्लोष करण्यापूर्वी या विद्यार्थ्यांना एक मिनिटे मौन राहून श्रद्धांजली वाहू, असे म्हटले. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही जे आंदोलन देशभरात पेटवले आणि त्याला जे यश आले त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. या देशातील जेन झी सरकारच्या झिंज्या कशा उपटते, हे या आंदोलनातून कळाले, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या 21 तरुणांची नावे वाचून दाखवत त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता मौन बाळगण्याचे आवाहन केले.

तसेच, राज ठाकरेंनी यावेळी मुंबई पोलिसांचे आणि महाराष्ट्र पोलिसांचे सुद्धा आभार मानले. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो. त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केले. मला असे वाटते की, हाच महाराष्ट्रातील आणि दिल्ली पोलिसांमध्ये फरक आहे. महाराष्ट्राचे पोलीस कसे आहेत आणि दिल्लीतील पोलीस कसे आहेत, हे आता जगाला कळले. त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणेचे आभार मानतो, असे यावेळी राज ठाकरेंनी म्हटले. तसेच, सभेसाठी आलेल्या तरुणाईने आता पोलिसांना सहकार्य करत घरी जावे, असे आवाहनही राज ठाकरेंनी उपस्थितांना केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.