Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा', '१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा.' मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

'मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा', '१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा.' मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

जालना : खरा पंचनामा 

अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून यावेळी त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. आमरण उपोषणाचा आज (३१ ऑगस्ट 2026) तिसरा दिवस असून ५८ लाख कुणबी नोंदींची अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र उपोषण सुरू झाल्यानंतरही सरकारकडून चर्चेसाठी कोणताही अधिकृत संपर्क झालेला नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

सोमवारी आंदोलकांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी आगामी मुंबई आंदोलनाबाबत नवी रणनीती मांडली. मराठा बांधवांनी वाहनांवर झेंडे न लावता मुंबईत पोहोचण्यास सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. मुंबईत नातेवाईक, मित्र किंवा परिचितांकडे मुक्काम करावा आणि सध्या आझाद मैदान किंवा 'वर्षा' निवासस्थानाच्या दिशेने जाऊ नये, असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.

आंदोलनादरम्यान पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जरांगे यांनी केले. अंतरवाली सराटीतील गर्दी काही प्रमाणात कमी झाली तरी मुंबईतील उपस्थिती वाढवण्यावर भर द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

रविवारी आंदोलकांना संबोधित करताना जरांगे यांनी सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला. या मुदतीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन मुंबईतील आंदोलनाची अंतिम तारीख जाहीर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील आंदोलन पाच टप्प्यांत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. मोठ्या संख्येने मोटारसायकलींसह आंदोलनासाठी तयारी करण्याचे आवाहन करताना संपूर्ण आंदोलन शांततेत झाले पाहिजे आणि कोणत्याही ठिकाणी जाळपोळ किंवा हिंसाचार होऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी समर्थकांना दिले.

उपोषणाबाबत जरांगे यांनी अत्यंत भावनिक भूमिका मांडली. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपण शेवटपर्यंत लढणार असल्याचे सांगत, उपोषणादरम्यान आपला मृत्यू झाला तरी मृतदेह मुंबईला घेऊन जावा, असे त्यांनी समर्थकांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आंदोलनस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले.

आता १२ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकार जरांगे यांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, चर्चेची प्रक्रिया सुरू होते का आणि प्रस्तावित मुंबई आंदोलनाबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.