अब्दुल सत्तार मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला; तासभर चर्चा, पण जरांगे पाटील 'वर्षा'वरील आंदोलनावर ठाम
जालना : खरा पंचनामा
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे, ते येत्या 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी येत्या 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक दिली आहे, या आंदोलनात समाजाने मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहान देखील त्यांनी केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता सरकार दरबारी हालचालीला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये तब्बल एक तासांपेक्षा अधिक चर्चा झाली.
29 ऑगस्टपासून मनोज जरांगेंकडून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. सरकार तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे, त्यामुळे उपोषण टाळा अशी विनंती यावेळी सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही तुमच्या विरोधात नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, असंही यावेळी सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावर बोलताना सरकारने समाजाचं वाटोळं केलं, आता उपोषण करणारच असं सत्तार यांना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. समाजाशी दगा करून आपण कधीच जगू शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. आम्ही मुंबईत येणार, आम्ही म्हणतो फडणवीस साहेब आमचे, मग तुम्हाला आम्हाला वर्षा बंगल्यावर बसू द्यायला काय हरकत आहे? आम्ही खोलीत बसत नाहीत, बंगल्यावर बसू, आम्ही वर्षावर आंदोलन करण्यावर ठाम आहोत. अस यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.