RTO सोबतचा वाद, समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा करून चालक पसार, वाहनांच्या लाबंच लांब रांगा
मुंबई : खरा पंचनामा
समृद्धी महामार्गावर एका ट्रकचालकाने चक्क ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा लावून चावी घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६० जवळ घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचालकाचा आरटीओच्या अधिकाऱ्यांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या चालकाने ट्रक महामार्गावरच आडवा लावला आणि वाहनाची चावी घेऊन तेथून निघून गेला. ट्रक आडवा असल्याने महामार्गावरील एका मार्गाची वाहतूक पूर्णपणे अडवली गेली.
गेल्या दीड तासापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबल्याची माहिती आहे. अचानक वाहतूक थांबल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. घटनास्थळी वाहनांच्या रांगा वाढत असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक चौधरी आणि त्यांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. चालक नेमका कुठे गेला आणि आरटीओसोबत त्याचा वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.