रघुवीर घाटात पुन्हा मोठी दरड कोसळली: रत्नागिरी-सातारा मार्ग ठप्प, 21 गावांचा संपर्क तुटला
खेड : खरा पंचनामा
रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात गुरुवारी मध्यरात्री पुन्हा मोठी दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर माती व मोठे दगड आल्याने वाहनांची ये-जा बंद झाली असून, सातारा जिल्ह्यातील सुमारे २१ गावांचा रत्नागिरीशी संपर्क विस्कळीत झाला आहे.
दरड कोसळलेल्या ठिकाणी अकल्पे-खेड एसटी बस सकाळपासून अडकली असून, बसमधील विद्यार्थी, महिला आणि अन्य प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले आहे. खेडकडे येणारे अनेक प्रवासीही घाटात अडकले होते; परंतु प्रवासी उतरून पायी चालत परत आपल्या गावी निघून गेले. दरड हटविण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून काम सुरू करण्यात आले आहे. रस्ता पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोसळलेली दरड मोठी असून, मोठमोठे दगड जेसीबीने फोडता येत नाहीत किंवा ते बाजूलासुद्धा करता येत नाहीत. त्यामुळे हे दगड फोडण्यासाठी ब्रेकर मागविलेला आहे. त्यामुळे ही दरड मोकळी करण्यासाठी मध्यरात्री उशीर होईल; परंतु छोट्या वाहनांसाठी थोडा रस्ता मोकळा करून दिलेला आहे, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन रेडीज यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.