जिल्हा न्यायाधीश न्यायालयात येताच केलं पदमुक्त !
नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमध्ये कार्यरत जिल्हा न्यायाधीश यांना आज (११ एप्रिल) पदमुक्त करण्यात आले. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे पथक नाशिकला दाखल झाले होते. त्यांनी ही कारवाई केल्याचे बोलले जाते. या कारवाईने न्यायालयात एकच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी जिल्हा न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू झाले आणि कामकाज सुरू होताच एक मोठा निर्णय झाला. मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी घेतलेल्या या निर्णयाने सबंध जिल्हा न्यायालयात एकच खळबळ उडाली. दिवसभर तो चर्चेचा विषय होता.
जिल्हा न्यायाधीश (६वे) आर. आर. राठी हे सकाळी दहा वाजता आपल्या कार्यालयात उपस्थित झाले व त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी निरोप पाठवून बोलवून घेतले आणि त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले.
जिल्हा न्यायाधीश आर आर राठी यांच्या काही न्यायालयीन निवाड्यांबाबत तक्रारी होत्या. जिल्हा न्यायाधीशांनी दिलेल्या निकालांचा गोषवारा आणि पडताळणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करीत असतात. ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. या संदर्भात आलेल्या तक्रारींचेही अवलोकन केले जाते. जिल्हा न्यायाधीश राठी यांच्या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी याबाबतची कार्यवाही झाली होती.
नियमित प्रक्रियेनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या पथकाने न्यायाधीश राठी यांच्याबाबत चौकशी केल्याचे कळते व त्यानंतर ही कारवाई झाली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी जिल्हा न्यायाधीशांना पदमुक्त करण्याचे पत्र पाठविले होते. त्यानुसार ही कार्यवाही झाली.
जिल्हा न्यायाधीश राठी यांच्याबाबत काही तक्रारी होत्या किंवा कोणती कारवाई झाली आणि कोणते प्रकरण होते याबाबत दिवसभर जिल्हा न्यायालयात चर्चा सुरू होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.