जागतिक ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई : खरा पंचनामा
जागतिक ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन. वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नारळीकरांनी 11 जून 1964 रोजी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडला होता. अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी हा सिद्धान्त मांडला होता. त्यातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. त्यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला. हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे देखील अपरिमित नुकसान आहे, अशी भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. विज्ञान विषयातला ज्ञानवृक्ष असेच नारळीकर यांचे वर्णन करावे लागेल. खगोलशास्त्रातील त्यांचे श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व जगमान्य आहे. रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहून त्यांनी विज्ञानासारखा रुक्ष विषय सुबोध केला. केंब्रीज विद्यापीठात शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम, आयुका संस्थेची उभारणी, २०२१ नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असा त्यांच्या कार्याचा आवाका होता. त्यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला. हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे देखील अपरिमित नुकसान आहे. नारळीकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो,अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
जयंत नारळीकर यांनी १९६५ मध्ये भारतदर्शन मोहीम काढत ठिकठिकाणी व्याख्यानं दिली. सरकारकडूनही नारळीकरांची दखल घेण्यात आली होती. १९६५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यावेळी ते सत्तावीस वर्षांचे होते. पुढे२००४ मध्ये त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मानही मिळाला. २०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. खगोल भौतिकी क्षेत्रात त्यांनी अनेक दशके संशोधन केले. खगोल शास्त्रासारखा किचकट विषय अतिशय सोप्या शब्दात त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला. वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली.अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांवरही त्यांनी काम केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.