Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संजय कपूर, मधमाशी आणि कौनिस सिंड्रोमसांगलीतील छातीरोग विशेषतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे विश्लेषण

संजय कपूर, मधमाशी आणि कौनिस सिंड्रोम
सांगलीतील छातीरोग विशेषतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांचे विश्लेषण

गुरुवार दिनांक १२ जून २०२५ या दिवशी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडिया फ्लाईट-१७१ चे बोईंग ड्रिमलायनर- ७८७ हे विमान उड्डाण केल्यानंतर कांही क्षणात वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले. विमानातील एक व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बचावली. विमानातले इतर सर्व मृत्युमुखी पडले. अहमदाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक वैद्यकीय विद्यार्थी आणि कर्मचारी दगावले. संपूर्ण देश हळहळला. ही बातमी जगभर पसरली. ज्या इंग्लंडला हे विमान चालले होते, तिथे त्याच दिवशी एक घटना घडली.‌ तिथे एका सुप्रसिद्ध उद्योगपतीचा आश्चर्यकारकरित्या मृत्यू झाला. ही व्यक्ती म्हणजे संजय कपूर. अमेरिकन नागरिकत्व असलेले मूळ भारतीय उद्योगपती. हिंदी सिनेअभिनेत्री करिष्मा कपूर यांचे पूर्वाश्रमीचे पती.
कदाचित ही बातमी आपण सर्वांनी वाचली असेल. 
संजय कपूर हे इंग्लंडमध्ये १२ जून या दिवशी पोलो खेळत होते. घोड्यावर बसून रपेट मारत खेळल्या जाणाऱ्या या खेळात मग्न असताना अचानक एक मधमाशी संजय कपूर यांच्या तोंडात गेली. प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, संजय कपूर यांच्या तोंडात त्या मधमाशीने डंख मारला.
संजय कपूर यांनी ते फारसे मनावर न घेता ती मधमाशी गिळून टाकली. पण थोड्यावेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांनी खेळ थांबवला. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.‌ मृत्यूचे कारण होते,  हृदयविकाराचा झटका. ५३ वर्षीय संजयकपूर यांना हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण ठरली ती म्हणजे मधमाशी.
 
असे खरेच घडू शकते का ?
होय. मधमाशी किंवा अशा प्रकारच्या कीटकाच्या चावण्यामुळे शरीरात ॲलर्जीची क्रिया घडते आणि व्यक्तीच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी निर्माण होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. ही प्रक्रिया विनाविलंब घडते. या आजाराला 'कौनिस सिंड्रोम' Kounis Syndrome असे म्हणतात. 

काय असतो हा कौनिस सिंड्रोम ?
आपल्याला ॲलर्जी हा शब्द नवा नाही. ॲलर्जी म्हणजे एखाद्या पदार्थाविषयी शरीरामध्ये असणारी अतिसंवेदनशीलता.
जेव्हा एखादा पदार्थ शरीरात जातो आणि त्या पदार्थाविषयी अतिसंवेदनशीलता असेल तर, पेशींमध्ये अनेक क्रिया घडून येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव स्त्रवले जातात. हे स्त्राव म्हणजे ही वेगवेगळ्या प्रकारची रसायने शरीरातील विविध भागांवर अनिष्ट परिणाम करतात आणि त्या व्यक्तीमध्ये लक्षणे दिसून येतात याला ॲलर्जी म्हणतात. 
ज्या पदार्थामुळे ॲलर्जी होते , त्याला ॲलर्जन किंवा अँटिजेन म्हणतात. इथे या केसमध्ये मधमाशी आणि मधमाशीतील विषारी द्रव्य हे ॲलर्जन किंवा अँटिजेन होय. शरीरात प्रवेश केल्यानंतर हे ॲलर्जन शरीरातील मास्ट पेशींना चिकटतात. या मास्टपेशींवर असलेल्या प्रतिपिंडांशी संयोग पावल्यानंतर मास्ट पेशी फुटतात आणि त्यातून वेगवेगळी रसायने बाहेर पडतात. आणि ही रसायने विविध लक्षणे निर्माण करतात.‌ ॲलर्जीच्या प्रकारानुसार सर्दी, शिंका, नाक गळणे, श्वासनलिकांना सूज आल्याने त्या अरुंद होऊन दम लागणे, छातीतून घरघर आवाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, अंगाला खाज सुटणे, डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, घशात खवखवणे अशी अनेक लक्षणे दिसतात. पण जेव्हा ॲलर्जी किंवा ॲनाफायलॅक्टिक प्रकारच्या क्रियेमुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हार्टअटॅक येतो. तेव्हा त्या स्थितीला 'कौनिस सिंड्रोम' असे म्हणतात.

कोणाला आणि कसा होतो हा आजार ?
ॲलर्जीचा विकार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला असा त्रास उद्भवू शकत असला तरी, या प्रकारचे रुग्ण खूप क्वचित प्रमाणात आढळतात. किंवा याचे प्रत्येक वेळी निदान होत नाही. १९९१ मध्ये 'निकोलस जी कौनिस' आणि 'जॉर्ज जवरस' यांनी या स्थितीचे 'ॲलर्जिक अन्जायना' Allergic Angina' असे वर्णन केले. या सिद्धान्तानुसार मास्ट पेशींमधून बाहेर पडणाऱ्या हिस्टॅमिनमुळे हृदयरोहिण्या आकुंचित पावतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होतो. मास्टपेशींबरोबरच आय.जी.ई. तसेच  कॉम्प्लिमेंट सिस्टीम किंवा नॉन-इम्युनोलॉजिक मार्गाने, हिस्टॅमिन, ट्रिप्टेज, पी.ए.एफ., ल्यूकोट्राईन्स, थ्रॉम्बोक्झेन ए २ इत्यादी रसायनांमुळे हृदयरोहिण्या अत्यंत वेगाने तीव्रपणे आकुंचित होतात. प्लेटलेट नावाच्या पेशी उद्दीपित होतात. हृदयरोहिण्यांमध्ये गुठळी निर्माण होते किंवा आधीच कठीण झालेल्या हृदयरोहिण्यांचे अस्तर फुटून हृदयरोहिणी पूर्णपणे बंद पडू शकते.

कौनिस सिंड्रोमचे तीन मुख्य प्रकार आहेत.
१. पूर्वीपासून हृदयविकार नसलेल्या निरोगी व्यक्तींमधील कौनिस सिंड्रोम - ज्या व्यक्तीला आधीपासून कोणत्याही प्रकारचा हृदयविकार किंवा जोखीम / रिस्क फॅक्टर नाही, अशा व्यक्तींमध्ये हृदयरोहिण्या अचानकपणे आकुंचित पावल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होऊन हार्ट अटॅक येतो.
२. ज्यांना आधीपासून हृदयविकार आहे आणि रक्तरोहिण्या कठीण झालेल्या आहेत, अशा कठीण झालेल्या  रक्तवाहिन्यांच्या कठीण भागाला प्लाक plaque असे म्हणतात.‌ ॲलर्जीमुळे हा प्लाक फुटतो आणि त्यातील पेस्ट सारखा भाग रक्तवाहिन्यांच्या पोकळीत येतो.  रक्तवाहिनी खंडित होते आणि हार्टअटॅक येतो.
३. ज्या व्यक्तींना आधी हार्टअटॅक येऊन गेलेला आहे किंवा ज्यांची ॲंजिओप्लास्टी झालेली आहे किंवा ज्यांना स्टेंट बसविला आहे,  त्या व्यक्तींच्या हृदयरोहिण्या ॲलर्जीमुळे बंद पडू शकतात आणि हार्टअटॅक येऊ शकतो.

कशाकशाची ॲलर्जी असू शकते ?
आपल्या पर्यावरणातील अनेक सेंद्रिय पदार्थ किंवा परागकण , बीटा लॅक्टम क्विनोलोनसारखी अँटिबायोटिक्स, NSAID, ओपिऑइड्स सारखी औषधे,  मधमाशी, किडा ,विंचू ,शेलफिश यांचे विषारी द्रव्य , बदाम किंवा इतर ड्रायफ्रूट्स , पर्यावरणीय लेटेक्स, वैद्यकीय तपासणीत किंवा उपचारासाठी वापरली जाणारी कॉन्ट्रास्ट औषधे, हार्डवेअर , ड्रग-एल्यूटिंग स्टेंट, पेसमेकर लीड इत्यादी गोष्टी ॲलर्जन ठरू शकतात आणि त्यामुळे हार्टअटॅक येऊ शकतो.

कोणती लक्षणे असतात ?
अशा व्यक्तीमध्ये ॲलर्जीची इतर लक्षणे दिसतात. जसे की पुरळ किंवा अंगावर लाल गांधी उठणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छाती घरघरणे , रक्तदाब अचानक कमी होणे, अस्वस्थ वाटणे, छातीत दुखणे, अचानक प्रचंड घाम येणे, थोडी सुद्धा हालचाल करणे अशक्य होणे. 
अशा व्यक्तीच्या कार्डिओग्राम मध्ये हार्ट अटॅक आल्याची चिन्हे दिसतात. रक्तातील कार्डियाक एंजाइम्स चे प्रमाण वाढलेले दिसते. रक्तातील ट्रिप्टेज/हिस्टॅमिन वाढलेले दिसून येते. इकोकार्डिओग्राफी किंवा कोरोनरी ॲंजिओग्राफी यातून पक्के निदान होते. 

उपचार कोणते ?
जेव्हा अशा प्रकारची ॲलर्जीची रिॲक्शन उद्भवते, तेव्हा तातडीने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणे अत्यावश्यक असते. रुग्णाची नाडी- रक्तदाब इत्यादी वर तातडीने नियंत्रण आणून आजाराचे निदान करणे आवश्यक असते. कार्डिओग्राम म्हणजे ईसीजी काढून काही मिनिटात याचे निदान होते. रुग्ण अत्यवस्थ असेल तर, तातडीचे उपचार - जीव वाचवणारी औषधे द्यावी लागतात.‌ हृदयविकाराचा झटका आला असेल तर, त्यावरील औषधे देऊन रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

संजय कपूर हे का वाचू शकले नाहीत ?
खरे तर अशा घटनांमधून सर्वांनी काही गोष्टी शिकायला हव्यात. मुळात आपण जेव्हा कुठे बाहेर असतो आणि एखादा कीटक किंवा मधमाशी आपल्या सानिध्यात येते किंवा आपल्याला दंश करते, तेव्हा ती गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी. शक्य असल्यास तो कीटक किंवा मधमाशी यांना मारून ती सोबत घ्यायला हवी,  जेणेकरून कीटकाचा प्रकार डॉक्टरांना समजतो. संजय कपूर यांच्या तोंडात मधमाशी गेली तर त्यांनी ती गिळायला नको होती  ,तर थुंकून टाकायला हवी होती. अशावेळी मधमाशी किंवा कीटक थुंकून गुळण्या केल्या तर, त्याची विषबाधा कमी होते. वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये जाणे महत्त्वाचे असते. संजय कपूरनी या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नसाव्यात. त्यामुळे मधमाशीचे विष भिनत गेले आणि रासायनिक प्रक्रिया होत गेल्या. अशा प्रकारच्या ॲलर्जीची कारणे वर नमूद केली आहे. त्यामुळे सर्वांनीच ही दक्षता घ्यावी. आणि याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ,जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणतेही कारण नसताना हार्टअटॅक आला तर, अशा व्यक्तींमध्ये वर नमूद केलेली ॲलर्जीची लक्षणे आहेत का याची पडताळणी करावी आणि त्याबद्दल डॉक्टरांना कल्पना द्यावी.
यानिमित्ताने ॲलर्जीमुळे हार्टअटॅक सुद्धा येऊ शकतो आणि अशाप्रसंगी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो, एवढे जरी आपण शिकलो तर, अशी घटना निदान आपल्याभोवती पुन्हा घडणार नाही. 

- डॉ. अनिल न. मडके,  छातीरोग विशेषतज्ज्ञ, सांगली

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.