मुंबईतील कबुतरखाने बंद करणार; कबुतरांना दाणे टाकण्यावरही बंदी येणार
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला. कबुतरखान्यांमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचं सांगत प्रश्न उपस्थित केला. यानंतर मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला तात्काळ देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
तसेच काही रहिवाशी भागात सुद्धा कबुतरांना दाणे दिले जातात. यामुळे कबुतरे एका ठिकाणी एकवटतात. पण या कबुतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी वाढत आहे त्यामुळे कबुतरांना दाणे टाकण्यावरही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत 51 कबूतरखाने आहेत. या ठिकाणी कबूतरांमुळे श्वसनविकार, दुर्गंधी आणि प्रदूषण वाढत असून, यावर नियंत्रण आवश्यक आहे. त्यादृष्टीने कबूतर खाण्यांबाबत तातडीने विशेष ड्राईव्ह घेण्याबाबत मुंबई महापालिकेला आदेश देण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषदेच्या सदस्य मनिषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते. यावेळी सदस्य चित्रा वाघ यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. मुंबईतील कबूतरखाने आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक त्रासाबाबत मंत्री सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.
काही कबूतरखाने न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले होते असे सांगून मंत्री उदय सामंत म्हणाले की, हे कबूतरखाने पुन्हा सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी कबूतरांना धान्य टाकणे थांबवावे यासाठी जनजागृती आवश्यक आहे. महापालिकेला एक महिन्यात कबूतरखाने बंद करण्यासाठी विशेष ड्राईव्ह राबवण्याचे आणि जनजागृती मोहिम सुरू करण्याचे निर्देश लवकरच दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.