तिसंगीत घाटनांद्रेच्या तरुणाचा निर्घृण खून
अनैतिक संबंधाच्या कारणाचा संशय : तीन ते चार संशयितांचा शोध सुरु
सांगली : खरा पंचनामा
दिघांची-हेरवाड राज्य मार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी गावाच्या हद्दीत घाटनांद्रे रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा खून अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संशयितांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे.
सुनील विलास शिंदे (वय 30 रा. घाटनांद्रे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सुनील शिंदे हा ट्रॅक्टर चालक होता. सकाळी तिसंगी येथे घाटनांद्रे रोडच्या कडेला त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळच एक मोठा रक्ताने माखलेला दगड सापडला असून, त्याच दगडाने ठेचून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक जोतीराम पाटील, सहायक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनीही भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
कवठेमहांकाळ पोलिसात रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. एलसीबी आणि कवठेमहांकाळ पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.