बैलाचा जन्मदाखला आणा!
चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याकडे पोलिसांची विचित्र मागणी
रायगड : खरा पंचनामा
एका शेतकऱ्याचे बैल चोरीला गेले असता बैलाची तक्रार घेऊन गेलेल्या शेतकऱ्यालाच पोलिसांनी "बैलाचा जन्मदाखला आणा" असा प्रश्न विचारला. या विचारलेल्या प्रश्नाने सर्वच स्तरांवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही अचंबित करणारी घटना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंजप गावातील तानाजी माळी यांच्यासोबत घडली आहे. या शेतकऱ्याच्या घराच्या अंगणातून रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचा बैल पळवून नेल्याची घटना घडली.
बैल चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीन ते चार गोतस्कर पावाचे तुकडे टाकून बैलाला घराच्या अंगणातून बाहेर खेचत नेत असल्याचं दिसतं. त्यांनतर त्यांनी बैलाला एका आलिशान वाहनात बसवलं आणि पळ काढला. सकाळी उठल्यावर त्यांना बैल कुठेही दिसला नाही. त्यांना बैल चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ नेरळमधील कशेळे पोलीस चौकीत तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. तिथे पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर ते कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा तिथे त्यांना आणखी विचित्र अनुभव आला.
कर्जत पोलिसांनी त्यांना विचारलं, "बैलाचा जन्मदाखला आहे का? दाखला आणा मग तक्रार घेतो!" हा विचित्र प्रश्न ऐकून शेतकरी चक्रावून गेला. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. "बैल चोरीला गेला, पोलिसांकडे तक्रारद्यायला गेलो तर ते जन्मदाखला मागतात! मग न्याय मागायचा कुणाकडे?" असा सवाल स्थानिक शेतकरी संतापाने विचारत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.