'मागची पानं पलटायची तर खुशाल पलटा'
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिल्यानंतर आज अजित पवारांनी या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. "प्रत्येकाला पान चाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार त्यांनी वापरावा. मी माझी भूमिका मांडतो, ते त्यांची भूमिका मांडतील," असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही फडणवीसांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवारांना पुन्हा इशारा दिला.
"मागची पानं पलटवली तर अजित पवारांनाही बोलता येणार नाही. ७० हजार कोटींचं प्रकरण अजून न्यायप्रविष्ठ आहे," असं बावनकुळे म्हणाले. यावर अजित पवारांनी फार न वाढवता थोडक्यात उत्तर दिलं.
अजित पवार म्हणाले, "मी उमेदवारांची बैठक घेतली आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. एकोप्याने प्रचार करा, बोलताना काळजी घ्या, कुणालाही दुखावेल असं बोलू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत."
"राज्यात आणि केंद्रात आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. पण महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढतोय. गेल्या नऊ वर्षांत पिंपरी-चिंचवडची काय अवस्था झाली, हे सगळ्यांना माहिती आहे."
भाजपवर टीका करताना अजित पवार म्हणाले, "भाजपच्या काळात महानगरपालिका कर्जबाजारी झाली, नियोजनशून्य कारभार झाला. आम्ही २५ वर्षांत शहरात अनेक नवनवीन गोष्टी आणल्या आहेत."
माध्यमांवर नाराजी व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, "मी फक्त महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल बोललो आहे आणि त्याचे पुरावेही दिले आहेत. इतर कोणतेही आरोप केलेले नाहीत. मात्र मीडियाने वक्तव्य फुगवून वेगळ्याच पद्धतीने दाखवलं, त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या."
"पान चाळण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. पण शेवटी जनता जनार्धन आहे. सगळ्या बाजू ऐकून जनता निर्णय देईल. आता मी फक्त संबंधित महानगरपालिकेतील मुद्द्यांवरच बोलणार आहे," असं म्हणत अजित पवारांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.