सत्ताधारी-विरोधातील महिला खासदार आमने-सामने
पंतप्रधान सभागृहात येण्याआधीच लोकसभेचं कामकाज तहकूब
नवी दिल्ली : खरा पंचनामा
"पंतप्रधानांमध्ये आज लोकसभेत येण्याची हिंमत नाही", असं राहुल गांधी आज सकाळी संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना म्हणाले. एकप्रकारे त्यांनी मोदींना आव्हानच केलं होतं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभागृहात हजर राहणार होते, परंतु, त्याआधीच सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने करून ट्रेजरी बेंचजवळ हाणामारी केली, त्यामुळे कामकाज थांबवावं लागलं, असं वृत्त इंडिया टुडेने दिलं.
भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी दावा केला की विरोधी पक्षांतील अनेक महिला खासदार सभागृहाच्या वेलमध्ये घुसल्या, पंतप्रधान बसतात त्या खुर्चीच्या दिशेने गेल्या. वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांना त्यांच्या जागी परत जाण्याचे वारंवार आवाहन करूनही महिला खासदार जागेवर आल्या नाहीत. तिवारी यांच्या मते, परिस्थिती नियंत्रणाबाहेर राहिल्याने पंतप्रधान सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत. "पंतप्रधान जिथे बसतात तिथे महिला खासदार गेल्या. त्यांनी मोठा गोंधळ घातला", असा आरोप तिवारी यांनी केला. त्यांनी पुढे असा दावा केला की विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक देहबोलीने आले आणि त्यांच्या वर्तनामुळे गंभीर सुरक्षा चिंता निर्माण झाल्या. पंतप्रधानांवर हल्ला देखील करू शकले असते, असा दावाही तिवारी यांनी केल्याचं इंडिया टुडेने वृत्तात म्हटलं आहे.
विरोधी पक्षाचे खासदार घोषणाबाजी करत वेलमध्ये प्रवेश करताना दिसले. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे सदस्यही यात सामील झाले आणि निषेध तीव्र करत त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावेळी पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. दरम्यान, विरोधी महिला खासदारांचा एक गट ट्रेझरी बाकांकडे गेला आणि त्यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना हाक मारली. परिणामी जोरदार शाब्दिक चकमक झाली. तर, त्यानंतर भाजपाच्या महिला खासदारही विरोधी पक्षातील खासदारांजवळ गेल्या. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला खासदार आमने-सामने आल्या.
सभापतींनी आदेश देऊनही हा गोंधळ सुरूच राहिला. सभागृह तहकूब झाल्यानंतर, काँग्रेस आणि इतर विरोधी महिला खासदार पुन्हा ट्रेझरी बाकांकडे सरकल्या, पंतप्रधानांच्या खुर्चीच्या मागे दोन रांगांपर्यंत पुढे गेल्या आणि दुबे यांच्या दिशेने निघाल्या, असंही सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मंत्री खासदारांना मागे हटण्याचा आग्रह करताना दिसले, परंतु महिला खासदार पुढे जात राहिल्या. काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा यांनी नंतर हस्तक्षेप केला आणि दोन्ही बाजूंच्या सदस्यांना त्यांच्या जागी परत जाण्यास सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.