मारहाण प्रकरण मुंबईच्या महापौरांना भोवणार!
शाळेतील वादाच्या खटल्यातून निर्दोष मुक्ततेस न्यायालयाचा नकार
मुंबई : खरा पंचनामा
२०१६ मधील बहुचर्चित 'शिक्षक मारहाण' प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडेयांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे महापौरांच्या विरोधातील फौजदारी खटला आता नियमितपणे सुरूच राहणार असून, त्यांना न्यायालयाच्या फेऱ्यांमधून तूतांस दिलासा मिळालेला नाही. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २०१६ सालातील हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. सांताक्रूझ येथील एका उर्दू शाळेतील कॅन्सरग्रस्त शिक्षकाच्या बदलीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादात रितू तावडे यांच्यासह इतर सहा जणांनी शाळेत जाऊन शिक्षकांशी हुज्जत घातली होती.
आरोपानुसार, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रितू तावडे यांनी दोन शिक्षकांच्या कानशिलात लगावली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यमान महापौर रितू तावडे यांनी स्वतःला या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. ही घटना २९ जुलै २०१६ रोजी वाकोला भागातील एका महापालिकेच्या उर्दू-माध्यमाच्या शाळेत घडली होती, कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका महिला शिक्षिकेच्या अचानक बदलीवरून हा वाद सुरू झाल्याचा आरोप आहे. फिर्यादी पक्षाने म्हटले आहे की, तावडे यांनी इतर सहा जणांसह शाळेत प्रवेश केला आणि शिक्षिकेच्या बदलीवरून व्यवस्थापनाशी जोरदार वाद घातला, तसेच दोन शिक्षकांना मारहाणही केली. पीडितांच्या जबानीच्या आधारे, या प्रकरणात महापौरांवर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे आढळले आहेत, असे न्यायालयाने म्हटले.
महापौर तावडे यांनी याचिकेत असा दावा केला की, 'घटनास्थळी त्यांची उपस्थिती योगायोगाची होती आणि या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. त्यांनी म्हटले की, तक्रारदाराने (शाळेच्या मुख्याध्यापिकेने) अवाजवी प्रसिद्धी मिळवण्यासाठी भाजपचे नगरसेवक म्हणून त्यांच्या पदाचा गैरवापर केला.' अर्जदाराची राजकीय ओळख कळल्यावर, तक्रारदाराने द्वेषपूर्ण हेतूने आणि छुप्या उद्देशाने कृती केली आणि आपली वैयक्तिक तक्रार बळकट करण्यासाठी अर्जदाराला या प्रकरणात खोटे गोवले, असे महापौर म्हणाल्या.
पोलिसांचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सरकारी वकील इक्बाल सोळकर यांनी युक्तिवाद केला की, पीडितांच्या जबाबावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, तावडे यानी दोन शिक्षकांना कानशिलात लगावली होती. फिर्यादी पक्षाने युक्तिवाद केला की शाळा है असे ठिकाण आहे. जिथे विद्यार्थी जीवनातील धडे शिकतात, परंतु हाणामारी तिथे घडल्यामुळे या कृत्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, प्रकरणातील तथ्यांचा विचार करून न्यायाधीश म्हणाले, पीडितांनी अर्जदाराचे नाव स्पष्टपणे घेतले आहे, ज्याने शाळेत त्यांच्यावर हल्ला केला होता'.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.