उत्तरं द्यायला ४२ पैकी एकही मंत्री हजर नाही; सभागृह दोन वेळा तहकूब
मुंबई : खरा पंचनामा
राज्य विधीमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशन काळात सर्व मंत्र्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेऊन विरोधकांनी विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांना उत्तरं देणं अपेक्षित असतं.
थेट जनतेशी संबंधित हे प्रश्न असल्यानं तसंच सभागृहात दिलेल्या उत्तरांची अधिकृत नोंद घेतली जात असल्यानं मंत्र्यांच्या उत्तरांकडं सर्वसामान्य जनतेच्या नजरा असतात. पण या मंत्र्यांनाच अधिवेशनाचं गांभीर्य नसल्याचा प्रकार समोर आला आहे. विधानपरिषदेत एकही मंत्री उत्तर देण्यासाठी हजर नसल्यानं दोन वेळेला सभागृह तहकूब करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आजच्या दिवसातली ही घडामोड असून सकाळी १० वाजता ठरल्याप्रमाणं विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी विरोधी बाकांवर विरोधीपक्षातील आमदारांनी हजेरी लावली, त्यांच्याकडं विविध प्रश्न देखील तयार होते. पण या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी राज्य सरकारमधील ४२ मंत्र्यांपैकी एकही मंत्री उपस्थित नव्हता. त्यामुळं उत्तर देण्याची जबबादारी ज्या मंत्र्यांवर असते तेच उपस्थित नसल्यानं विरोधकांनाही प्रश्न उपस्थित करता आले नाहीत. मंत्रीच उपस्थित नसल्यामुळं कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच १० मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली पण त्यानंतरही एकही मंत्री सभागृहात हजर नसल्यानं पुन्हा सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं. विधान परिषदेच्या सभापती निलम गोऱ्ह यांच्यावर दोन वेळा मंत्री नसल्यामुळं सभागृह स्थगित करण्याची नामुष्की ओढवली.
दरम्यान, एकही मंत्री आज विधानपरिषदेत का हजर राहू शकला नाही? याचं कारणही अद्याप समोर आलेलं नाही. पण यामुळं मंत्र्यांना वेळेचं आणि सभागृहाच गांभीर्य नसल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.