उद्धव ठाकरे यांची मध्यरात्री मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर भेट?
मुंबई : खरा पंचनामा
विधान परिषद निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर भेटल्याचा दावा करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. ही भेट नेमकी कोणत्या अनुषंगाने झाली. एकेकाळच्या या दोन मित्रांमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हा सध्या राज्यात औत्सुक्याचा विषय ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही नेत्यांमधील बेबनाव आणि युती तोडल्याचे शल्यही वारंवार दिसले. तर या महिन्याच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या आमदारांच्या समारोपाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी जोरदार शेरोशायरी केली आणि एकमेकांना आदरही दाखवला. या दोघांमधील जुगलबंदी ही चर्चेचा विषय ठरली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसने एक ट्विट केले आहे. त्यात सूत्रांच्या माहिती आधारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी मध्यरात्री भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण या भेटीचा तपशील मात्र समोर येऊ शकला नाही. राज्यात विधान परिषद निवडणुकीवरून अनेक मतप्रवाह समोर येत आहे. उद्धव ठाकरे हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होऊ इच्छित नसल्याचे म्हटले जात असतानाच आता या भेटीने मोठा ट्विस्ट आणला आहे.
2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये तत्कालीन संपूर्ण शिवसेना आणि भाजप यांच्यात खडाजंगी झाली. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. हा भाजपसाठी मोठा सेटबॅक मानल्या जात होता. पण पुढे फडणवीसांनी मोठा डाव खेळला. अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडत महायुती सत्तेत आली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मंचावर आणि अनेक मुलाखतीत फडणवीस यांच्याविषयी कोणताही आकस नसला तरी विरोधाची कारणंही स्पष्ट केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंसोबत चहा घ्यायला हरकत नसल्याचे वक्तव्य करून सर्वांनाच धक्का दिला. या दोघांमध्ये अबोला असला तरी संवादाला जागा असल्याचे दिसून आले होते. आता या ट्विटचा दावा जर खरा मानला तर या सुसंवादाला सुरुवात झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
एका अंदाजानुसार, उद्धव ठाकरे हे वरिष्ठ सभागृह विधान परिषदेसाठी इच्छुक नाहीत. पण त्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीची गणितं बिघडण्याची शक्यता आहे.
कारण एकच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आहे. जर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार समोर आला तर मतं फुटण्याची आणि महायुतीचा अजून एक उमेदवार निवडून येण्याची भीती वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे हे सभागृहात असणे भाजपसाठी सोयीस्कर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्या दृष्टीने या भेटीला मोठे महत्त्व आले आहे. तर खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर फडणवीस आणि उद्धव ठाकरे हेच सांगू शकतील असे म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.