चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरे यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी घडत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण तशा घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दबदबा आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही आमदार जिंकून आला नसला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा ठसा आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांना गर्दी होते. त्यांच्या भाषणांचा मोठा परिणाम राज्यातील तरुण वर्गामध्ये होताना दिसतो. तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. याशिवाय मनसे कार्यकर्ते हे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मनसैनिक मराठी माणसासाठी वेळप्रसंगी अंगावर केसेही घ्यायला तयार असतो. मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आग्रही असतात आणि त्यांचे कार्यकर्ते देखील तितकेच आग्रही असतात. नुकतंच महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा चांगलाच गाजलेला बघायला मिळाला. यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले. राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे गेले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप समजू शकलेलं नाही. चंद्रशेखर बावनकुळे अचानक राज ठाकरे यांच्या भेटीला का गेले असावेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरही दोन्ही नेत्यांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
विशेष म्हणजे राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे शिवतीर्थ बंगल्याबाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी बावनकुळे यांना राज ठाकरे यांच्या भेटीमागचे कारण विचारले. पण चंद्रशेखर बावनकुळे काहीही न बोलता निघून गेले. त्यामुळे या भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून किंवा राज ठाकरे यांच्या पक्षाकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, राज्यातील राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हिंदी भाषेची परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात मनसेने कठोर भूमिका घेतली होती. या विषयावरुन मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाल्याने अखेर सरकारने या परीक्षेला स्थगिती दिली आहे. या घडामोडी नुकत्याच घडल्या असल्याने या घडामोडींबाबत दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाली असावी का? असादेखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.