"ते वर्तन कोणत्याही राजकीय द्वेषामुळे प्रेरित नव्हते, तर मुलाबद्दलच्या काळजीपोटी होते"
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील भाजपच्या मोर्चादरम्यान कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्याशी वाद घालणाऱ्या महिलेने आता आपली ओळख उघड केली आहे. या प्रकरणी सदर महिला गेल्या अनेक दिवसांपासून मौन बाळगून होती.
मात्र, तिने या घटनेवर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच बोललेल्या टीना चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की, त्या दिवशी त्यांचे वर्तन कोणत्याही राजकीय द्वेषामुळे प्रेरित नव्हते, तर एका आईच्या आपल्या मुलाबद्दलच्या काळजीपोटी होते. प्रभादेवी येथे राहणाऱ्या 50 वर्षीय टीना चौधरी या माजी टेलिव्हिजन अभिनेत्री आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांच्या पत्नी आहेत. टीना यांनी लोकांना या घटनेचे राजकारण न करण्याचे आणि याकडे केवळ एका नागरिकाची समस्या म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे.
21 एप्रिल रोजी वरळी-प्रभादेवी परिसरात भाजपने विरोधकांविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळी भाजपच्या 'जन आक्रोश' मोर्चामुळे वरळी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याचबाबत आता टीना चौधरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत या प्रकरणी स्पष्टता दिली आहे. त्या दिवशी त्या आपल्या मुलीला गाण्याच्या क्लासेसवरून आणायला जात होत्या. त्यांनी आपल्या मुलीला दुपारी 4 वाजता सोडले आणि त्यांना 4.45 वाजता तिला परत आणायचे होते. परंतु बसेसनी रस्ता अडवल्यामुळे त्या सुमारे दीड तास वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. टीना यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली, परंतु कोणीही ऐकले नाही. त्यांनी स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडीओमध्ये जमिनीवर फेकलेली बाटली केवळ पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी होती, कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
या व्हिडीओच्या माध्यमातून टीना चौधरी यांनी त्या नेमक्या कोणत्या कुटुंबातून येतात, याबाबतची पार्श्वभूमी सुद्धा सांगितली. याबाबत त्या म्हणाल्या की, त्या लष्करी कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा आणि वडिलांसह कुटुंबातील आठ सदस्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त करत म्हटले की, गणवेश घालणे म्हणजे जनतेची सेवा करणे, नागरिकांशी अनादराने वागणे नव्हे. टीना यांनी हेही स्पष्ट केले की, जेव्हा त्यांचा गिरीश महाजन यांच्याशी वाद झाला, तेव्हा संध्याकाळचे 6.15 वाजले होते आणि आपल्या मुलीपर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे त्या प्रचंड तणावाखाली होत्या. मात्र, टीना यांनी हेही मान्य केले की, गर्दीत फक्त महाजन यांनीच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांच्याच सूचनेनुसार बसेस हटवून मार्ग मोकळा करण्यात आला.
सोशल मीडियावर मिळालेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करताना, टीना चौधरी यांनी राजकीय पक्षांवर टीकाही केली. त्या म्हणाल्या की, सर्वच राजकीय पक्ष अनेकदा सामान्य लोकांच्या समस्यांबाबत उदासीन असतात. कोणत्याही पक्षाने आपल्याला राजकीय लक्ष्य बनवू नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात आणि कोणत्याही राजकीय वादात आपल्याला सहभागी व्हायचे नाही, हे त्यांनी स्पष्टपणे व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.