थलपती विजयचा 'राजीनामा बॉम्ब'
प्रस्थापित नेत्यांच्या छुप्या खेळीला १०७ आमदारांचे सडेतोड उत्तर
चेन्नई : खरा पंचनामा
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने तमिळनाडूच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेच आता थेट राजीनामा सत्रापर्यंत पोहोचला आहे.
जनमताचा अनादर करून जर पारंपरिक शत्रू असलेल्या द्रमुक (DMK) आणि अद्रमुकने (AIADMK) सत्तेसाठी हातमिळवणी केली, तर टीव्हीकेचे सर्व १०७ आमदार सामूहिक राजीनामा देतील, असा जळजळीत इशारा थलपती विजय यांच्या गोटातून देण्यात आला आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे चेन्नईपासून दिल्लीपर्यंत राजकीय भूकंप झाला आहे.
२३ एप्रिल रोजी झालेल्या रणसंग्रामात १०७ जागा जिंकून विजय यांचा पक्ष सर्वात मोठा ठरला असला तरी, बहुमताचा ११८ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना अवघ्या ६ जागांची गरज आहे. अशा परिस्थितीत सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी द्रमुक आणि अद्रमुक पडद्यामागून हालचाली करत असल्याचा संशय टीव्हीकेला आहे. "लोकांनी आम्हाला कौल दिला आहे आणि प्रस्थापित पक्ष लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत आहेत. जर या दोन्ही पक्षांनी छुपी युती केली, तर आम्ही विधानसभेत बसण्याऐवजी जनतेच्या दरबारात जाऊ," अशा शब्दांत टीव्हीकेच्या वरिष्ठ नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे.
दुसरीकडे, राज्यपाल आर. व्ही. अर्लेकर यांनी संख्याबळाचे पत्र असल्याशिवाय सत्तास्थापनेचा दावा स्वीकारण्यास नकार दिला आहे. या घटनात्मक कोंडीत निवर्तमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मात्र एक अनपेक्षित गुगली टाकली आहे. "विजय यांच्या सरकारने आमच्या लोककल्याणकारी योजना सुरू ठेवाव्यात, आम्ही सहा महिने त्यांना कोणताही त्रास देणार नाही," असे विधान स्टालिन यांनी केले आहे. स्टालिन यांचा हा 'सॉफ्ट कॉर्नर' ही रणनीती आहे की टीव्हीकेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
स्टालिन यांनी आपल्या निवेदनात विजय यांच्या जाहीरनाम्यातील २५०० रुपये महिला भत्त्याच्या आश्वासनावरही टोला लगावला आहे. "आम्ही दिलेला १० हजार रुपयांचा भत्ता तरी किमान सुरू ठेवा, कारण २५०० रुपये देणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे," असे सांगत त्यांनी विजय यांच्यासमोर प्रशासकीय आव्हान उभे केले आहे. आता विजय हे काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांच्या मदतीने ११८ चा आकडा गाठून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की राज्यात पुन्हा निवडणुकीचे ढग जमा होणार, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. विशेष म्हणजे, थलपती विजय यांचा हा पहिलाच राजकीय डावपेच प्रस्थापित पक्षांना धडकी भरवणारा ठरला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.